नव्या फतव्यामुळे नागरिकांमध्ये उद्रेक
प्रतिनिधी/ रत्नागिरी
बुधवार रात्रीपासून रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन सुरु करताना अत्यावश्यक सेवेला मुभा असल्याचे जाहीर केले होते, मात्र शुक्रवारपासून अत्यावश्यक सेवा घरपोच देण्यासह त्यासाठी कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. प्रशासनाकडून निर्णयामध्ये अचानक होणारे बदल, त्या बाबतची अस्पष्टता यामुळे व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
अत्यावश्यक सेवेच्या स्वरुपाबाबत बदललेल्या धोरणाविरोधात नाराजीचे सूर उमटत आहेत. जिल्हय़ात 30 एप्रिलपर्यंत केवळ अत्यावश्यकच सेवा सुरू राहिल, असे परिपत्रक जारी करण्यात आले होते. गुरुवारी जिह्यात सर्वत्र याची अंमलबजावणी झाली. मात्र गुरूवारी रात्री अत्यावश्यक सेवेची दुकाने बंद करून घरपोच सेवा देण्याचा नवीन फतवा काढण्यात आला. याची शुक्रवारी अचानक अंमलबजावणी सुरु झाल्याने नागरिकांसह व्यापाऱयांमध्येही संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. अत्यावश्यक सेवेतील सर्व घटकांची सरसकट कोरोना चाचणी केली जात आहे. अशा निर्बंधामुळे व्यवसाय करणे अशक्य होणार असल्याच्या प्रतिक्रिया अनेक व्यावसायिकांनी व्यक्त केल्या. मात्र प्रशासनाच्या नव्या फतव्याची माहिती मिळताच सर्व व्यावसायिकांनी शुक्रवारी दुकाने बंद केली.
एकीकडे रूग्णसंख्येत मोठी वाढ होत असताना रुग्णांना दाखल करण्यासाठी नातेवाईकांना दिवसभर ताटकळत रहावे लागत आहे. त्यामुळे आधी आरोग्य यंत्रणा सक्षम करा आणि मगच कोरोना चाचण्या करा, असा संतापजनक सूर उमटत आहे. जिल्हय़ात दररोज रुग्णसंख्या वाढत असताना डॉक्टरांची कमतरता, अपुऱया खाटा याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
चौकट
जिल्हय़ाचे पालकमंत्री मात्र या बाबत अनभिज्ञ?
जिल्हय़ाचे पालकमंत्री ऍड. अनिल परब केवळ उद्घाटन कार्यक्रमाला रत्नागिरीत येवून गेले. मात्र सध्या रत्नागिरीत कोरोनाची बिकट असताना त्यांनी प्रत्यक्ष येवून वस्तूस्थिती पाहणी करणे आवश्यक होते. ते या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ आहेत का, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. या बाबत अधिक माहिती घेण्यासाठी पालकमंत्री परब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.