प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात आजपासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. केवळ वैद्यकीय आस्थापना आणि काही अत्यावश्यक विभाग सोडल्यास सर्व आस्थापना, कार्यालये बंद राहतील. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्हा पोलिसांनी नियोजन केले असून महामार्ग तसेच प्रत्येक नाक्यांवर, सार्वजनिक ठिकाणी पोलिसांचा कडक ‘वॉच’ राहणार आहे. नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल. कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्हय़ातील वाढती रूग्णसंख्या आणि मृत्यूदर पाहता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन व नियमांची काटेकोर अंमलबजावणी अत्यावश्यक बनली आहे. त्यासाठे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून 9 जूनपर्यंत कडक अंमलबजावणी झाल्यास निश्चितच फायदा होईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.
दुकाने उघडी आढळल्यास 10 हजाराचा दंड
केवळ दूधाची होम डिलिव्हरी करण्यास सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. अन्यथा वैद्यकीय अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना बाहेर पडता येणार नाही. प्रत्येक ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी व इतर परिसरात पोलिसांचा पहारा, गस्त यांचे नियोजन करण्यात आले आहे. कोणतेही दुकान उघडल्याचे आढळल्यास 10 हजार दंडाची कारवाई होणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बुधवारीही बाजारपेठेत गर्दी
3 जूनपासून कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मंगळवारप्रमाणेच बुधवारीही बाजारपेठेत गर्दी झाली होती. पहाटे 6 वाजता आलेले दूध सकाळी 8 वाजेपर्यंत तर कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी पहाटे 5 वाजता संपली होती. या ठिकाणी भाजी घेण्यासाठी विक्रेत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. अनेक नागरिकांनी 7 दिवसाच्या साहित्याची खरेदी करून ठेवण्याचा आटापीटा केल्याने ही गर्दी झाल्याचे सांगण्यात आले.
पतसंस्था, बँका सकाळी 11 ते 2 चालू राहणार
गुरुवार 3 ते 9 जून 2021 पर्यंत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होणार आहे. मात्र या कालावधीत सहकारी संस्था, बँका सकाळी 11 ते 2 या कालावधीत सुरू ठेवण्याचे आदेश पारित झाले आहेत. त्यामुळे जिह्यातील सर्व पतसंस्था आपले नियमित आर्थिक व्यवहार करू शकतील. मात्र गर्दी होणार नाही, सोशल डिस्टसिंगचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी व्यवस्थापनावर ठेवण्यात आली आहे. या नव्या आदेशामुळे मुळ आदेशातील संदिग्धता दूर झाली आहे. यामुळे पतसंस्था सकाळी 11 ते 2 या वेळेत व्यवहार करू शकतील, असे पत्रक जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी प्रसिद्ध केले आहे.