पहिली ते बारावीचे सव्वादोन लाख विद्यार्थी येणार प्रत्यक्ष वर्गात
प्रतिनिधी/ रत्नागिरी
वाढत्या कोरोना रुग्णांमुळे रत्नागिरी जिल्हय़ातील माध्यमिक आणि प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचा थांबलेला किलबिलाट आज 1 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होणार आहे. आजपासून पहिली ते बारावीच्या जिल्हय़ातील सव्वादोन लाख विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे नव्याने उघडणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग 24 जानेवारी पासून सुरु करण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. मात्र रत्नागिरी जिल्हय़ात पालकमंत्री ऍड. अनिल परब यांच्याबरोबर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या चर्चेनंतर 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शाळा व्यवस्थापन समितींची बैठक घेऊन शाळा चालू करण्याबाबत मतांची पडताळणी केली. यामध्ये 90 टक्क्याहून अधिक शाळांनी प्रत्यक्ष अध्यापन चालू करण्यास तयारी दर्शवली. 26 जानेवारी रोजी पालकमंत्री ऍड. अनिल परब यांनी जिल्हा प्रशासनासोबतच्या घेतलेल्या बैठकीत शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल पालकमंत्र्यांपुढे ठेवण्यात आला. त्यावर झालेल्या चर्चेनंतर पालकमंत्र्यांनी 1 फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करून शाळा चालू करण्यास हिरवा कंदील दर्शविला. त्यानुसार आज मंगळवारपासून जिल्हय़ातील पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळेत कोरोना संदर्भातील सर्व निर्देशांचे कसून पालन करूनच प्रत्यक्ष शाळा चालू करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.