सातारा / प्रतिनिधी
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने चौथ्या टप्प्यात समावेश असलेल्या सातारा जिल्हय़ात गेल्या सोमवार 7 जूनपासून अनलॉकअंतर्गत अत्यावश्यक सेवांना सोमवार ते शुक्रवार असे आठवडय़ातील पाच दिवस सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. तर शनिवार 12 व रविवार 13 रोजी वीकेंड लॉकडाऊन राहणार आहे. संपूर्ण संचारबंदी राहणार असून वैध कारणाशिवाय कोणालाही फिरता येणार नाही. यात कृषीविषयक दुकानांना सवलत देण्यात आली असून ही दुकाने सातही दिवस सुरू राहणार आहेत. तिसऱया लाटेसाठी प्रशासन सज्ज होत असून शुक्रवारी माझे मुल, माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाला. जिल्हय़ाची रूग्णवाढ 800 च्या दरम्यान स्थिर असून गुरूवारी रात्रीच्या अहवालात 751 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मृत्यूचे प्रमाण पुन्हा वाढले असून 36 मृत्यूची नोंद झाली आहे. सायंकाळी 922 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कृषी सेवा दुकाने सर्व दिवस सुरू राहणार
अनलॉक अंतर्गत शासनाने निश्चित केलेल्या पाच टप्प्यांत जिल्हा अजूनही चौथ्या टप्प्यात असून पॉझिटिव्हीटी 11 टक्क्यांवर आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश जारी करत वीकेंड लॉकडाऊनमधून कृषी दुकानांना सवलत दिली.
जिह्यात 7 जूनपासून जिल्हा प्रशासनाकडून शनिवार व रविवार यादिवशी संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यावेळी वैध कारणाशिवाय कोणत्याही नागरिकास संचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामध्ये सुधारणा करुन शेतकऱयांना आवश्यक बियाणे, खते, शेती विषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱया सेवांची दुकाने आठवडय़ाचे सर्व दिवस दुपारी 2 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शेतीविषयक मशागत करण्याची सेवा करण्यास आठवडय़ाचे सर्व दिवस सायंकाळी 4 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
शैक्षणिक साहित्य घरपोच करण्यास परवानगी
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून 14 जूनपासून सकाळी 9 ते 2 या वेळेत केवळ शैक्षणिक साहित्य घरपोच पुरविण्यास परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकाने मेडिकल, दवाखाने वगळता बंद राहणार आहेत.
751 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित
जिह्यात गुरूवारी रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 751 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. यात सर्वाधिक 161 रूग्ण सातारा तालुक्यात नोंद झाले आहेत. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे – जावली 28 (8005), कराड 136 (24305), खंडाळा 31 (11169), खटाव 135 (17893), कोरेगाव 44 (15513), माण 66 (12235), महाबळेश्वर 12 (4154), पाटण 40 (7567), फलटण 69 (27406), सातारा 161 (37472), वाई 20 (12067) व इतर 9 (1159) असे आजअखेर एकूण 178945 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
जिल्हय़ात आजपर्यंत कोरोना मृत्यू चार हजारावर
गेल्या चोवीस तासात मृत्यूसंख्येत पुन्हा वाढ झाली. 36 मृत्यूंची नोंद झाली असून यात सर्वाधिक 8 मृत्यू कराड तालुक्यात आहेत. आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे – जावली 0 (182), कराड 8 (708), खंडाळा 1 (143), खटाव 3 (443), कोरेगाव 6 (352), माण 2 (240), महाबळेश्वर 0 (44), पाटण 4 (169), फलटण 3 (270), सातारा 6 (1135), वाई 3 (318) व इतर 0 असे आजअखेर जिह्यामध्ये एकूण 4004 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
922 नागरिकांना डिस्चार्ज
शुक्रवारी जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 922 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. त्यामुळे सक्रीय रूग्णांचे प्रमाण 10603 इतके आहे.
जिल्हय़ात 2700 बेड शिल्लक
जिल्हय़ात प्रशासनान 4800 बेडची उपलब्धता केली आहे. यातील 2700 बेड शुक्रवारी शिल्लक होते. व्हेंटीलेटरसह आयुसीयु बेड 63, व्हेंटीलेटरशिवाय आयसीयु बेड 209 शिल्लक आहेत. तर ऑक्सिजन बेड 1864 तसेच विना ऑक्सिजन बेड 564 शिल्लक आहेत.