प्रतिनिधी/ रत्नागिरी
सोमवार सायंकाळपर्यंत कोरोनामुळे जिल्हय़ात आणखी तिघांचा मृत्यू झाला आहे. संगमेश्वर, लांजा व राजापुरातील प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाल्याने जिल्हय़ातील कोरोनाबळींची एकूण संख्या 135 झाली आहे. शुक्रवार सायंकाळपासूनच्या 24 तासांत 51 नवे रूग्ण आढळले असून 59 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाबाधीतांची एकूण संख्या 4 हजारांच्या उबरठय़ावर पोहचली आहे.
कोरोनामुळे उपचार घेत असलेल्या संगमेश्वर, राजापूर व लांजा येथील रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे लांजातील कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 3, राजापूर तालुक्यात 8 तर संगमेश्वर तालुक्यात 11 झाली आहे. कोरोनाने आतापर्यंत सर्वाधिक 43 बळी रत्नागिरी तालुक्यात गेले आहेत.
रविवार सायंकाळपासूनच्या 24 तासांत जिल्हय़ात 51 नवे रूग्ण आढळले आहेत. यामध्ये आरटीपीसीआर चाचणीमध्ये रत्नागिरीत व चिपळुणात प्रत्येकी 9 व संगमेश्वरात 3 असे 21 जण पॉझीटीव्ह आढळले आहेत. तर ऍन्टीजेन चाचणीत रत्नागिरीत 12, दापोलीत 13, खेडमध्ये 3 तर लांजात 2 असे 30 नवे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधीतांची एकूण संख्या 3 हजार 932 झाली आहे.
आणखी 61 जण बरे
कोरोनावरील उपचारानंतर आणखी 61 जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयातून 8, कळंबणी 3, कामथे 5, देवरूख 1, समाजकल्याण रत्नागिरी 1, घरडा हॉस्पिटल 8, लांजा 9, पेढांबे 3, माटे हॉल चिपळूण 5 व पाचलमधील 18 जणांचा समावेश आहे.