प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आता जिल्हाभरात सौर ऊर्जा वापरासाठी विशेष अभियान हाती घेतले जात आहे. ग्रामपंचायती, प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र व उपकेंद्रातही सौरपॅनेलसह गावागावात सौर पथदीपांच्या वापराला प्राधान्य देण्यावर भर दिला जात आहे. यासाठी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजनकडे 4 कोटी 14 लाखाच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद प्रशासनासह ग्रामपंचायतींना वीज बिलांपोटी दरवर्षी लाखो रुपये खर्च करावा लागत आहे. त्याला पर्याय म्हणून गावपातळीवर सौर पॅनेलसह सौर पथदीप वापराला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून सौर ऊर्जेला प्राधान्य दिले जात आहे. जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद केली जाते. या योजनेतून जिल्हा परिषदेसह पंचायत समितींच्या इमारतींवरही सौर विजेचे पॅनेल लावण्यात येत आहेत. इमारतींवरील सौर पॅनेलसह आता गावागावात उभारण्यात येणाऱया सौर पथदीपांसाठी मागणी वाढली आहे. त्यानुसार आवश्यक निधी जिल्हा नियोजनमधून दिला जात आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाकडे 2021-22 या आर्थिक वर्षासाठी सौरपॅनेल व पथदीपांसाठी 1 हजार 85 प्रस्ताव जिल्हाभरातून प्राप्त झाले आहेत. त्यात ग्रामपंचायत, प्राथमिक शाळांसह आरोग्य केंद्रांच्या इमारतींवर सौरपॅनेल उभारण्याचेही प्रस्ताव असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेत सौर ऊर्जा निर्मिती अंतिम टप्प्यात
रत्नागिरी जिल्हा परिषद आता सौर ऊर्जा निर्मितीद्वारे स्वयंपूर्ण होणार आहे. त्यासाठी इमारतीवर सौर पॅनेल बसवण्याचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्याकडे पोहोचले आहे. ग्रिडला वीज देण्यासाठी जोडणी करण्याचे काम सुरु केले जात आहे. येत्या 8 दिवसात हे काम पूर्ण होण्यासाठी प्रभारी जि. प. अध्यक्ष तथा उपाध्यक्ष महेश नाटेकर यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता.