अत्यावश्यक वगळता सर्व सेवा बंद : जिल्हय़ाच्या सीमाही राहणार बंद : शेतीची कामे सुरू राहणार
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर योग्य ती खबरदारी घेतली न गेल्याने आणि कणकवली तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने 2 ते 8 जुलै या सात दिवसांच्या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. या लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत. प्रवासी वाहतूक बंद राहणार आहे. जिल्हय़ाच्या सर्व सीमा बंद राहणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन कार्यालये वगळता सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये दहा टक्केच कर्मचाऱयांची उपस्थिती असणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर राज्यात 22 मार्चपासून लॉकडाऊन सुरू केले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हे लॉकडाऊन वाढविण्यात आले. मात्र लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात बहुतांशी सेवा सुरू केल्या. लॉकडाऊनमध्ये मोठी शिथिलता आणली गेली व अनलॉक प्रक्रिया सुरू झाली. मात्र या काळात योग्य ती खबरदारी घेतली गेली. कणकवली तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. चार दिवसांत 40 रुग्ण आढळले. पिंगुळीमध्येही रुग्ण वाढले. त्यामुळे जिल्हय़ात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये आणि कोरोना प्रसाराची साखळी तुटली जावी, यासाठी अखेर सिंधुदुर्ग जिल्हा सात दिवसांसाठी ‘लॉकडाऊन’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश कांबळे उपस्थित होते.
2 ते 8 जुलै दरम्यान लॉकडाऊन
2 ते 8 जुलै या कालावधीत जिल्हय़ात लॉकडाऊन राहणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये रुग्णालये, मेडिकल स्टोअर, किराणा दुकाने, दूध, भाजीपाला दुकाने, चिकन, मासे विक्री सुरू राहणार आहे. मात्र त्यांना सकाळी 9 ते 5 या वेळेतच सुरू ठेवता येणार आहे.
जिल्हय़ाच्या सीमा बंद
लॉकडाऊन काळात जिल्हय़ाच्या सर्व सीमा बंद राहणार आहेत. कुणालाच बाहेर जाता येणार नाही किंवा आत येता येणार नाही. फक्त इमर्जन्सी असली, तरच पास देऊन सोडले जाणार आहे. मात्र प्रसार माध्यमांना मुभा दिली जाणार आहे.
बाजारपेठा बंद
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा बंद राहणार आहेत. आठवडा बाजारही बंद राहणार आहेत. मद्य विक्रीचीही दुकाने बंद राहणार आहेत. मात्र कॉल करून मागणी केल्यास घरपोच सेवा देता येणार आहे. तसेच जिल्हय़ातील नागरिकांनाही अनावश्यक घराबाहेर पडता येणार नाही. तर अत्यावश्यक सेवा देणाऱया दुकानांमध्ये गर्दी करता येणार नाही. सोशल डिस्टन्सचे सहा फुटाचे अंतर ठेवावे लागणार आहे.
प्रवासी वाहतूक बंद
अनलॉक प्रक्रियेमध्ये ऑटो रिक्षा सुरू करण्यास परवानगी दिली गेली होती. तसेच फोर व्हीलरसाठी चालक व दोन व्यक्तींना परवानगी दिली होती. मात्र आता लॉकडाऊन काळात प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये दहा टक्केच उपस्थिती
शासकीय कार्यालयांमध्ये आपत्कालीन व्यवस्थापनाची कार्यालये वगळता सर्व शासकीय व निम शासकीय कार्यालयांमध्ये दहा टक्केच कर्मचाऱयांची उपस्थिती राहणार आहे.
शेतीची कामे सुरू राहणार
जिल्हय़ातील नागरिकांना अनावश्यकरित्या घराबाहेर पडता येणार नाही. मात्र शेतकरी लोकांना शेतीची कामे करता येणार आहेत. तसेच शेतीसाठी लागणारी खते किंवा औजारे, साहित्य आणायला जात येणार आहेत. त्यासाठी ठराविक कालावधीत ती दुकाने सुरू राहणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.
जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील नागरिकांनी चांगले सहकार्य केल्यामुळेच गेल्या तीन महिन्यांत कोरोनावर नियंत्रण ठेवता आले. मात्र काही नागरिकांनी होम क्वारंटाईन योग्य प्रकारे पाळले नाही. त्यामुळे जिल्हय़ात कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना पुन्हा वाढले. त्यामुळे आता होम क्वारंटाईनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. जनतेने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले.