65 वर्षांनंतर प्रथमच मार्चमध्ये तापमानात मोठी वाढ
प्रतिनिधी / कणकवली:
गेले दोन दिवस सूर्य आग ओकत होता, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सिंधुदुर्ग जिल्हय़ात गेल्या दोन दिवसांत उष्णतेची लाट आली आहे. 26 व 27 मार्च रोजी जिल्हय़ाचे सरासरी तापमान 40.5 अंशांपर्यंत पोहोचले होते. 28 मार्च 1956 मध्ये तापमान 41.7 अंशापर्यंत गेले होते. त्यानंतरची ही मोठी तापमान वाढ असल्याचे जिल्हा कृषी हवामान केंद्र तथा उद्यान विद्या महाविद्यालय मुळदेकडून सांगण्यात आले. तसेच शेतकऱयांनी आंबा, काजू पिकांसह नवीन लागवडीची कलमे, पाळीव जनावरे व स्वत:चीही या उष्णतेच्या लाटेपासून काळजी घेण्याचे आवाहनही उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रदीप हळदवणेकर व प्रा. यशवंत मुठाळ यांनी केले आहे.
प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र, मुंबईकडूनही सिंधुदुर्गमध्ये 25 नंतरच्या पुढील पाच दिवसांत सरासरी उष्णतेत वाढ होत जिल्हय़ात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून जिल्हय़ाच्या सरासरी किमान व कमाल तापमानात वाढ झाली आहे. याबाबत ग्रामीण कृषी मोसम सेवा, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्रा. डॉ. यशवंत मुठाळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 26 व 27 या दोन्ही दिवशी दिवसाचे कमाल तापमान 40.5 अंशापर्यंत पोहोचले होते. यापूर्वी मार्च महिन्यात तापमानात एवढी मोठी वाढ झालेली नव्हती. 1956 मध्ये 28 मार्च रोजी तापमान 41.7 अंशापर्यंत पोहोचले होते. त्यानंतरची मार्चमधील ही सर्वात मोठी तापमानवाढ असल्याचे त्यांनी सांगितले.
याचा परिणाम आंबा, काजू व इतर फळपिकांवर होण्याची शक्यता आहे. त्यात मोठय़ा प्रमाणात फळगळ होण्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण कृषी मोसम सेवा केंद्राच्यावतीने शेतकऱयांना आवाहनही करण्यात आले आहे. यात आंब्यासाठी झाडाच्या विस्तारानुसार प्रति झाड 80 ते 100 लीटर पाणी सात दिवसांच्या अंतराने द्यावे. बाष्पीभवन कमी करण्यासाठी जांभा जमिनीतील कलमांना गवताचे आच्छादन द्यावे. नवीन लागवड केलेल्या कलमांना शेडनेटच्या माध्यमातून सावली तयार करण्यात यावी. तसेच फळांमध्ये साका टाळण्यासाठी फळे काढताना सकाळी 10 च्या अगोदर व सायंकाळी चार नंतरच काढावीत. फळे कुजू नयेत, यासाठी उष्ण जल प्रक्रिया द्यावी, असे आवाहन करण्यात आले. तर काजूच्या बाबतीतही नवीन कलमांना सावली तयार करण्यात यावी. मोठय़ा काजू कलमांना 150 ते 200 लीटर पाणी 15 दिवसांच्या अंतराने देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
तसेच कोंबडय़ांपासून ते पाळीव जनावरे व शेतकऱयांनीही स्वत:ची काळजी घ्यावी. विविध भाजी, नारळ, सुपारी, वायंगणी भात, भुईमूग पिकांबाबतही काळजी घेण्याचे आवाहनही जिल्हा कृषी हवामान केंदाच्यावतीने करण्यात आले आहे.