प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना रूग्णांच्या संख्येत दररोज किमान दोन अंकी संख्येची भर पडत असताना शनिवारचा दिवस मात्र रत्नागिरीकरांसाठी दिलासादायक ठरला आहे. शुक्रवार सायंकाळपासूनच्या 24 तासात एकही नवा कोरोना रूग्ण सापडलेला नाही. विशेष दिलासादायी गोष्ट म्हणजे शनिवारी दिवसभरात कोरानातून बरे झालेल्या तब्बल 30 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात चिपळुण तालुक्यातील धामेली येथील 11 जणांचा समावेश आहे. इतक्या मोठय़ा संख्येने डिस्चार्ज मिळण्याची ही पहिलीच वेळ असून आतापर्यत बरे झालेल्यांची संख्या त्यामुळे 159 झाली आहे.
2 मे पासून चाकरमान्यांचे आगमन व कोरोनाग्रस्तांच्या संख्येचा वाढता आलेख असे समीकरण जिल्हय़ात तयार झाले आहे. गेल्या पंधरवडय़ात तर 100 हून अधिक रूग्णांची भर पडली होती. मात्र शनिवार जिल्हावासीयांना दिलासादायी ठरला आहे. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हय़ातील कोरोनाग्रस्तांची संख्या 343 होती ती शनिवारी सायंकाळी 6 वाजेपर्यत कायम राहीली आहे. दिवसभरात प्राप्त झालेले सर्व 43 अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
शनिवारी डिस्चार्ज मिळालेल्यांमध्ये संगमेश्वरमधील 8 तर रत्नागिरी व कामथे येथील 11 जणांचा समावेश आहे. तब्बल 30 जणांनी एकाच दिवशी डिस्चार्ज मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरानाग्रस्तांवर उपचार करणाऱया वैद्यकीय यंत्रणेचे हे मोठे यश मानले जात आहे. कामथेमधून डिस्चार्ज मिळालेले सर्व 11 जण धामेली या गावातील आहेत. या सर्वांचा 29 मे रोजी अहवाल पॉझीटीव्ह आला होता. शनिवारी डिस्चार्ज मिळालेल्या 30 जणांसह जिल्हय़ात 159 जण आतापर्यंत कोरानामुक्त झाले आहेत. जिल्हय़ात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 343 असून आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. एक्टीव्ह रूग्णांची संख्या 171 आहे.
372 अहवाल प्रलंबीत
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 6 हजार 744 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 6 हजार 372 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 343 अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. 372 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 372 प्रलंबित अहवालमध्ये 4 अहवाल कोल्हापूर येथे तर 368 अहवाल मिरज येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.
जिल्हय़ात सव्वा लाख नागरिक दाखल
परराज्यातून व अन्य जिह्यातून रत्नागिरी जिह्यात 05 जूनपर्यंत 1 लाख 20 हजार 83 व्यक्ती दाखल झाल्या असून 48 हजार 830 लोक जिल्हय़ाबाहेर गेले आहेत.
कन्टेंनमेन्ट झोन 116
जिह्यात सध्या 116 कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 15 गावांमध्ये, गुहागर 8, खेड 16, संगमेश्वर 23, मंडणगड 2, दापोली 16,लांजा 8, चिपळूण 17 आणि राजापूरात 11 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
होम क्वारंटाईन संख्या घटली
मुंबईसह तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. अशा लोकांची संख्या 90 हजारांवर गेली होती. मात्र आता त्यात मोठी घट होत असून शनिवारी सायंकाळपर्यंत ही होम क्वारंटाईन खाली असणाऱयांची संख्या 62 हजार 588 इतकी झाली आहे.