पोलीस दलाकडून खास उपाय , नियम मोडणांवर कारवाई
प्रतिनिधी/ सातारा
वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 1 जूनपर्यंत कडक लॉकडाऊनचा आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केला आहे. सोमवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून लॉकडाऊनला आरंभ झाला असून त्या अनुषंगाने पोलीस दलाकडून जिल्हय़ातील सर्व शहरातील वॉर्ड समिती, गावपातळीवर ग्राम दक्षता समिती अर्लट करण्यात आल्या आहेत. समितींमार्फत नागरिकांना माहिती देण्यात आलेली असून नियम मोडणारांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी दिली.
याबाबत प्रसिध्दी पत्रकान्वये दिलेल्या माहिती त्यांनी सांगितले आहे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत नियमांची कडक व प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याने सातारा जिल्हा पोलीस ठाणे हद्दीतील कोविड बाधीत गावांची लोकसंख्येनुसार यादी तयार करण्यात आलेली आहे. त्यानुसार ज्या ज्या गावात जास्त बाधित रुग्ण आहेत. तिथे नियम पाळण्यासाठी या गावांवर त्या त्या पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे लक्ष राहणार आहे.
संस्थात्मक विलगीकरणावर भर देणार
लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये नियमांचे उल्लंघन होणार नाही, गावामध्ये अत्यावश्यक कारणाशिवाय कोणी फिरणार नाही, विना मास्क कोणी वावरणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. गावपातळीवर संस्थात्मक विलगीकरणासारखी उपाय योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त होम क्वारंटाईन व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येत आहे. होम क्वारंटाईन व्यक्तींना शिक्के मारण्यात येणार असून त्या व्यक्ती घराबाहेर पडणार नाहीत याची दक्षता घेण्यात आलेली आहे.
ग्राम दक्षता समिती कार्यरत राहणार
गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्राम दक्षता समिती, ग्राम सुरक्षा दल यांची मदत घेण्यात आलेली आहे. गावे कोरोनामुक्त करुन कोव्हिड बाधित संख्या सुध्दा न वाढता शुन्यावर राहिल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. कोरोना रोगाचे अनुशंगाने निर्माण होणाऱया शंका निरासन करण्याकरीता सरपंच, पोलीस पाटील, ग्राम दक्षता समिती, ग्राम सुरक्षा दल यांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. तसेच कोरोना रोगाच्या प्रार्दुभाव अनुषंगाने कोणी अफवा पसरवून लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे.
बँकांचे कामकाज 11 ते 1 यावेळेत सुरु
सहकारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व खासगी बँका, सहकारी बँका 1 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तथापी जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी दि. 25 मे 2021 रोजीपासून 1 जून रोजीच्या सकाळी 7 पर्यंत या कालावधीत फक्त एटीएममध्ये पैसे भरणे, चेक क्लिअरन्स, डाटा सेंटरशी संबंधित बँकांचे कामकाज कार्यालयीन कामकाजादिवशी सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसेच बँकांचे सर्व उर्वरित कामकाज पूर्णपणे बंद राहील.
रुग्णांच्या एका नातेवाईकास पास
जिल्हय़ातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांना सुविधा/ आवश्यक गोष्टी पुरवण्यासाठी त्याच्या एका नातेवाईकास पोलीस विभागामार्फत पासची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. ज्या व्यक्तीकडे सदरचा पास/ परवाना असेल त्यांचेवर पोलीस विभागाची कारवाई होणार नाही. परंतू ज्या व्यक्ती विनाकारण विना परवाना फिरताना आढळून येतील त्यांचेवर पोलीस विभागामार्फत कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
वैद्यकीय सुविधा, मेडिकल सोडल्यास सर्व बंद
अत्यावश्यक सेवेतील वैद्यकीय सुविधा, दवाखाने, हॉस्पिटल्स, मेडिकल या सुविधा सोडल्यास दुकाने, मॉल, खासगी आस्थापना बंद राहणार आहेत. कृषी सेवा केंद्रे, फक्त अत्यावश्यक सेवेतील घटकांसाठी पेट्रोल पंप सुरु राहणार असून शेतकऱयांना पेट्रोल व डिझेल शेतीकामासाठी वापरण्यात येणाऱया वाहनांना मिळण्यासाठी सवलत देण्यात आलेली आहे. सार्वजनिक, खासगी वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद राहणार असून इतर जिल्हय़ात अत्यावश्यक कारणासाठी ईपास परवानगी असल्यास सोडण्यात येणार आहे.
नागरिकांनी सहकार्य करावे
जिल्हा पोलीस दलामार्फत कोरोना या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना राबविण्यात येणार असून सातारा जिल्हयातील नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी जिल्हय़ातील नागरिकांना केलेले आहे. जे नागरीक नियमांची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्यावर कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
नियम पाळून कोरोनाला हरवावे वाढता संसर्ग रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशासन व आरोग्य यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे. आता नवीन बाधित निर्माण होवू नयेत यासाठी काही दिवस सर्वांनीच काळजी घेवून कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. संसर्ग साखळय़ा तोडणे हा लॉकडाऊनचा मुख्य उद्देश असून गर्दी टाळणे, संपर्क टाळणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे या गोष्टी कटाक्षाने पाळून नागरिकांनी सहकार्य करावे.