पोलीस दलाकडून कारवाई वाढल्या – विनाकारण फिरणारांना दांडक्याचा प्रसाद
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हय़ात एकूण बाधितांच्या संख्येने एक लाखाचा आकडा पार केला असून दररोज दोन हजारांच्या संख्येने बाधित वाढ सुरुच असल्याने शेवटी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रशासनासमवेत बैठक घेवून सोमवारी दि. 4 ते 10 असा सात दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. कडक लॉकडाऊनच्या दिवशी जिल्हय़ात पोलीस दल अर्लट झाले होते. त्यामुळे सर्वच मोठया शहरांसह ग्रामीण भागातही पोलिसांनी कारवाईचे दांडके उगारल्याने रस्त्यावर विनाकारण फिरणारांना आळा बसला आहे. मात्र, नागरिकांनी आपापल्या परिसरातील बाधित वाढ रोखण्यासाठी स्वयंस्फुर्तीने नियम पाळण्याचा संदेश परिस्थिती देत आहे.
जिल्हय़ातील सातारा, कराड, फलटण, खटाव, कोरेगाव, वाई, पाटण, महाबळेश्वर, खंडाळा, जावली, माण सर्वच तालुक्यात तीन अंकी संख्येने बाधित वाढ होत असून अनेक गावात संसर्ग साखळया निर्माण झाल्यात. प्रशासनाकडून तीन नवीन हॉस्पिटल वाढवण्यात आली असली तरी अद्यापही जिल्हय़ात बाधित आलेल्या रुग्णांना व्हेंटीलेटर, ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी प्रचंड यातायात करावी लागत आहे.
संसर्ग साखळया तोडण्यासाठी आणि जिल्हय़ातील बाधित वाढ रोखण्यासाठी शेवटी प्रशासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केला. पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी पोलीस दलाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शहरासह ग्रामीण भागात देखील पोलीस दलाकडून बंदोबस्त तैनात करण्यात आले असून नागरिकांनी अत्यावश्यक कारण असेच तरच घराबाहेर पडावे, विनाकारण बाहेर फिरताना आढळल्यास गुन्हे दाखल करुन दंड तसेच वाहनेही जप्त करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे.
जिल्हय़ात अगोदरच कोरोनाच्या कहराने वातावरण पॅनिक झाले आहे. त्यातचा रस्त्यावर गर्दी करणे, फिरणे यामुळे संसर्ग वाढतच चालला आहे. तो थांबवण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळे अनेक नागरिक नियम पाळून घरात बसले होते. मात्र, काही विनाकारण फिरणाऱयांना पोलिसांचे फटके खाण्याची वेळ आली. जिल्हय़ातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काही दिवस तर सर्वांचेय योगदान आवश्यक ठरणारत आहे.
कारवाईनंतर रस्ते पडले ओस
जिल्हय़ात विविध पोलीस दलाकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला असून रस्त्यावर फिरणारांची चौकशी, तपासणी सुरु करण्यात आल्याने मग दुपारनंतर जिल्हय़ातील सर्वच रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली. ज्यांना खरंच वैद्यकीय कारणांसाठी बाहेर जायचे आहे त्यांना यामुळे दिलासा लाभला. रस्त्यावर जाणाऱया रुग्णवाहिका देखील विना अडथळा जात होत्या.
अनेक गावांमध्ये स्वंयस्फुर्तीने लॉकडाऊन
जिल्हय़ात अनेक गावांमध्ये कोरोनाच्या संसर्ग साखळया निर्माण झाल्या आहेत. त्या तोडण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय अंमलात आणण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. शहरांमध्ये अशा प्रकारे स्वयंस्फुर्ती दिसून येत नाही. मात्र, जिल्हय़ात ज्या ज्या गावांमध्ये रुग्ण संख्या वाढली आहे त्या त्या गावांनी स्वंयस्फुर्तीने लॉकडाऊन पाळण्यास सुरुवात केली आहे. अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी सामाजिक कार्यकते, युवक व संस्था पुढाकार घेत आहेत. त्यामुळे निश्चितपणे कोराना आटोक्यात येण्यास त्याची मदत होणार असून शहरांनी देखील या गावांचा आदर्श घेण्याची गरज निर्माण झालीय.
फसवणूक करणाऱयांवर गुन्हे दाखल करणार
सातारा जिह्यात आजपासून लॉकडाऊन जारी करण्यात आला असून चुकीचे कारणे सांगून घराबाहेर पडणाऱया व फसवणूक करणाऱयांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. प्रशासनाने विहित वेळेत जीवनावश्यक वस्तू घरपोच पोचवण्याची सुविधा निर्माण करून दिल्यामुळे आता केवळ रुग्णालय, मेडिकलच्या कारणांशिवाय आणि अत्यावश्यक सेवेत कार्यरत नागरिकांनाच घराबाहेर पडता येईल. अनेकजण चुकीची माहिती देऊन घराबाहेर पडत आहेत, पोलिसांची दिशाभूल करीत आहेत असे निदर्शनास आले आहे. पोलिसांच्या कारवाईदरम्यान चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्यास थेट गुन्हे दाखल करणार.