प्रतिनिधी/ सातारा
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात शासन व प्रशासनाकडून दुसऱया टप्यातील लॉकडाऊन सुरु झाला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच सर्वांनी बाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक असल्याचा इशारा दिलाय. तर शहरी व ग्रामीण भागातील बांधकामे सुरु ठेवण्यास अटी व शर्तीवर परवानगी दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेय. शासनाच्या नवीन आदेशानुसार काही बदल झाले असले तरी नागरिकांना रस्त्यावर फिरण्यास मनाई आहे. कोणत्याही प्रकारची वाहने रस्त्यावर आणू नयेत अत्यावश्यक सेवा सोडल्या तर लॉकडाऊन गांभीर्याने पाळून नागरिकांनी सहकार्य करावयाचे आहे.
जिह्यातील ग्रामीण व शहरी क्षेत्रा सध्या सुरु असलेल्या बांधकामास काम चालू करण्यासाठी अर्जदार यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे रितसर परवानगी घेणे बंधनकारक राहील. नगरपालिका, शहरी क्षेत्रामध्ये पूर्वीपासून चालू असलेली बांधकामे पूर्ववत चालू ठेवण्यासाठी परवानगी राहील. या बांधकाम कामावरील कामगार त्याठिकाणी वास्तव्यास असणे बंधनकारक आहे. क्षेत्राबाहेरील कोणताही कामगार आणता येणार नाही.
याकामी संबंधित नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी अहवाल संबंधित प्रांताधिकारी यांच्याकडे सादर करावे. त्यावर संबंधित प्रांताधिकारी यांनी परवानगी देण्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. ग्रामीण भागामधील चालू असलेली बांधकाम चालू करण्यासाठीच्या परवानगीसाठी अर्जदार यांच्या अर्जावरुन परवानगी देण्यात यावी. उपविभागीय अधिकारी यांनी फक्त कोरोना कालावधीसाठी चालू असलेल्या बांधकाम करण्यासाठीच परवानगी द्यावयाची आहे. बांधकामाच्या परवानगीबाबत अर्जदाराकडून 100 रुपयाच्या स्टॅम्पपेपरवर शपथपत्र घ्यावे व विनाविलंब चालू असलेल्या बांधकामास परवानगी द्यावी.
कामगारांच्या सुरक्षेची काळजी ठेकेदारावर
बांधकामाच्या ठिकाणावरील कामगार हे कामाच्या आवाराच्या बाहेर जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. संबंधित ठेकेदार यांनी कामगार यांच्या खाण्या-पिण्याची सोय कामाच्या आवारातच करणे आवश्यक आहे. ठेकेदार यांनी बांधकामाचे ठिकाण 5 किंवा 5 पेक्षा जादा कामगारांची गर्दी होणार नाही तसेच 5 पेक्षा जादा कामगारांची गर्दी होईल, असे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नाही याची दक्षता घ्यावी. परवानगी ही आजमितीस सातारा जिह्यात रहिवास असलेल्या कामगार यांच्यासाठीच असून नव्याने परजिह्यातील कामगार कामावर येणार नाहीत याची सर्वस्वी जबाबदारी ठेकेदार यांची राहील. कामाच्या ठिकाणी आवश्यक मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सींग तसेच सुरक्षिततेचे सर्व नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे.
गर्दी टाळणे नागरिकांसाठी हितकारक
सातारा जिल्हयातील कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवणेचे अनुषंगाने सातारा जिल्हयात यापुढेही क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदी लागू ठेवणे आवश्यक आहे, जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये 20 एप्रिल 2020 रोजीच्या सायंकाळी 6 वाजल्या पासून ते पुढील आदेश होईपर्यंत सातारा जिल्हयात कोणत्याही ठिकाणी एका वेळेस 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होणेस मनाई करण्यात आली आहे.
या अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
दुय्यम निबंधक कार्यालये हे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. हे प्रतिबंधात्मक आदेश पुढील बाबींना लागू राहणार नाहीत. सर्व बँका व वित्तीय सेवा व तदसंबंधीत आस्थापना. अन्न दूध, फळे व भाजीपाला, किराणा, पुरविणाऱया आस्थापना, खते, बियाणे, औषधे, कृषी यंत्रे अवजारे, ट्रक्टर उपकरणे व त्यांची दुरुस्ती, स्पेअरपार्ट, स्प्रे पंप, सिंचन साहित्य, पाईप, ठिबक/तुषार सिंचन, शेततळे अस्तरीकरणाचे कागद इत्यादी संबंधी दुकाने/निर्मिती, वाहतूक, दुरुस्ती., तसेच मटण, चिकन व मासे हे न शिजवलेल्या स्वरुपात मागणीप्रमाणे घरपोच देता येतील. दवाखाने, वैद्यकीय केंद व औषधी दुकाने व तदसंबंधीत आस्थापना, प्रसार माध्यमे, मिडीया व तदसंबंधीत आस्थापना चालू राहतील तथापि पेपरचे घरपोच वाटप बंद राहील.
आता या गोष्टीही राहतील सुरु
दुरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱया आस्थापना, मोबाईल कंपनी टॉवर व तदसंबंधीत आस्थापना. विदयूत पुरवठा, ऑईल व पेट्रोलीयम व उर्जा संसाधने व तदसंबंधीत आस्थापना. पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा करणाऱया आस्थापना व वरील सर्व आस्थापनांसाठी अत्यावश्यक असणारे वेअर हाऊस, शासकीय इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, पाणी टंचाई तसेच पावसाळा पुर्व अत्यावश्यक शासकीय कामे यांना प्राधान्य राहील. पशूखाद्य निर्मिती करणारे कारखाने. संबंधीत आयटी आणि आयटीईएस आस्थापना अत्यावश्यक सेवा संबंधीत वस्तू आणि मनुष्यबळ, वाहतूक करणारे ट्रक, औदयोगिक क्षेत्र तसेच औदयोगिक क्षेत्राव्यतिरिक्त मोठे उदयोग, आस्थापना व कारखाने याबाबत डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज अन्वये यापुर्वी दिलेल्या सर्व परवानग्या वैध राहतील.
दुचाकी, चारचाकी वापरास मनाई
प्रशासकीय, वैदयकीय् सेवा पुरविणाऱया व कोरोना नियंत्रणासाठी काम करणाऱया शासकीय व खाजगी व्यक्तींची वहातूक करणेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांना सूट राहील. तथापि यासाठी संबंधीताची ओळखपत्राची तपासणी करणे बंधनकारक राहील. कोणत्याही व्यक्तीला सातारा जिल्हयातील कोणत्याही रस्त्यावर गल्लोगल्ली याठिकाणी सायकल तसेच पारंपारिक, अपारंपारिक इंधनावर चालणाऱया मोटर सायकल, (गियरसह, गियर शिवाय), सर्व प्रकारची तीन चाकी / चार चाकी वाहने , हलकी वाहने , मध्यम वजनाची वाहने यांचा प्रवास व वहातूक यासाठी वापर करण्यास मनाई करण्यात आली
अत्यावश्यक सेवेतील वाहनांना परवानगी
अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी, कोरोना नियंत्रणासाठी कार्यरत असणारे अधिकारी / कर्मचारी, करोना नियंत्रणासाठी काम करणा-या खाजगी आस्थापना व कर्मचारी, वैद्यकीय उपचाराची गरज असलेल्या व्यक्ती व अत्यावश्यक सेवा सुविधा देण्यासाठी आवश्यक असणाऱया व्यक्ती हे वगळून (तथापि वैद्यकीय उपचारासाठी गाडीमध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त एक व्यक्ती यांनाच प्रवास देय राहील.) तसेच वैदयकीय क्षेत्रातील सर्व डॉक्टर, नर्स, सायंटिस्ट, पॅरामेडीकल स्टाफ, लॅब टेक्निशियन व इतर आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग यांना सर्व प्रकारचा प्रवास अनुज्ञेय राहील.
थुंकल्यास होणार एक हजार रुपये दंड
सातारा जिल्हयातील सर्व शासकीय व निमशासकीय जागा व सर्व खाजगी जागा (जेथे सामान्य माणसांचा वावर आहे) अशा कोणत्याही ठिकाणी थूंकणेस मनाई करणेत येत आहे आणि कोणीही व्यक्ती थुंकल्यास त्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल व हा दंड ती जागा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असेल त्यांचेकडे जमा करावा लागेल किंवा हा दंड त्या स्थानिक स्वराज्य संस्थेस वसूल करावा लागेल.
विनाकारण फिरणाऱयांवर कारवाईचे आदेश
जिल्हयातील सर्व धार्मिक स्थळे या आदेशान्वये बंद करण्यात येत आहेत. तसेच या जिल्हयाची हद्द ही वाहनांच्या वाहतूकीसाठी इतर जिल्हयासाठी बंद करण्यात येत आहे. तसेच सातारा जिल्हयात सर्व व्यक्तींना नाक व तोंडास मास्क न लावता घरातून बाहेर पडणेस सक्त मनाई करणेत येत आहे. तसेच पोलीस अधिक्षक यांनी पूर्ण जिल्हयात विनाकारण अनावश्यकपणे वावरणा-या व्यक्तींवर योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेऊन नियंत्रण ठेवावे. जिल्हयातील जीवनावश्यक वस्तूंची अवैध साठेबाजी व काळाबाजारी होणार नाही याची दक्षता पोलीस विभाग, पुरवठा विभाग, अन्न व औषध विभाग यांनी घ्यावी.
शहरी व ग्रामीण क्षेत्रातील कंपन्यांना परवानगी
औद्योगिक तसेच खाजगी क्षेत्रामधील कारखाने, कंपन्या चालू करण्याबाबत यापूर्वी पारित केलेले आदेश वैध राहतील. तसेच जिह्यातील ग्रामीण क्षेत्रामधील सर्व कंपन्या, (ओगलेवाडी ता.कराड परिसर, तसेच नगरपालिका व नगरपरिषद क्षेत्रातील वगळून) चालू ठेवण्यासाठी खालील अटी व शर्तीवर नव्याने परवानगी देण्यात येत आहे. कंपनीतील अधिकारी, कर्मचारी, कामगारांची राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था कंपनीचे आवारातच करावी. ग्रामीण क्षेत्रातील, औदयोगिक क्षेत्रातील वसाहती, संस्था, मधील फक्त मॅनेजमेंट स्टाफला फक्त कंपनीच्या वाहतूक बसमधून प्रवास करता येईल. मॅनेजमेंट स्टाफसाठी वेगळा वाहतूक परवाना व कर्मचारीनिहाय वैयक्तिक परवाना घेता येइल. तथापि, मॅनेजमेंटसाठी कंपनीला फक्त त्याच कामासाठी खास वाहतूक यंत्रणा उभारावी लागेल. मॅनेजमेंट स्टाफमधील व्यक्तींना वैयक्तिक वाहनाने कोणत्याही सबबीवर प्रवास करता येणार नाही. तसेच कंपनीच्या वाहतूक परवान्यामध्ये प्रवास करणे देय असलेल्या व्यक्तीव्यतीरिक्त इतर व्यक्तीने बसमधून प्रवास केल्यास संबंधित कंपनीच्या मॅनेजमेंट व व्यवस्थापकीय संचालक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणेत येईल.