राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली देशव्यापी संप
प्रतिनिधी/ रत्नागिरी
केंद्र व राज्य शासनाच्या मनमानी कारभारामुळे कर्मचारी, कामगार, कंत्राटी कामगार, कर्मचारी आदींवर अन्याय होत आहे. या आरोपाखाली सर्व कर्मचारी, कामगारांनी एकत्र येऊन गुरूवारी संविधान दिनी देशव्यापी संप केला. संपात रत्नागिरी जिल्हय़ातील विविध कर्मचारी संघटनांनी प्रत्यक्ष सहभाग तर अनेक संघटनांनी संपाला पाठिंबा तर काही कर्मचारी संघटना वरिष्ठ स्तरावरून आदेश नसल्याने सहभागी झाल्या नव्हत्या. मात्र अनेक कार्यालयाच्या विविध कर्मचारी संघटनांनी सहभाग घेतल्याने या कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता.
महाराष्ट्र राज्य कामगार संयुक्त संघटना कृती समिती व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा रत्नागिरी यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी संपात सहभागी झाले होते. जिह्यातील कामगार, कर्मचाऱयांनी या देशव्यापी संपात सहभाग घेतला. या संपकऱयांनी आजच्या संविधान दिनाचे औचित्य साधून आपल्या न्याय हक्कांसाठी हा संप केला. या संपात जिल्ह्य़ातील विविध कर्मचारी संघटनांचा प्रत्यक्ष तर अनेक संघटनांचा अप्रत्यक्ष सहभाग होता. संपात सर्व शासकीय कर्मचारी तसेच शिक्षक, बँकांमधील कर्मचारी सहभागी झाल्याने जनतेची मोठी गैरसोय झाली. या संपामध्ये शेतकरी, कामगारविरोधी कायदे रद्द करा, कामगार संहिता 2020 त्वरित मागे घ्या, कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू करा, कामगारांना कायम करा, वीजबिल रद्द करा, नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, आयकरदार नसलेल्या कुटुंबाला दरमहा साडेसात हजार निर्वाह भत्ता द्या, असंघटित मजुरांना पीएफ, विमा, मासिक पेंशन द्या, सर्वांना जुनी पेंशन योजना लागू करा आदी मागण्या करण्यात आल्या.