जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मणहळ्ळी
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहरास जोडणाऱया गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील सिमेवर आणि संपर्क रस्त्यावर आरोग्य तपासणी पथकांचे नियोजन करण्यात आले आहे, जिल्हय़ात कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी आणि दक्षता घेण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मणहळ्ळी यांनी दिली. तसेच जिल्हय़ात कोणतेही कोरोना विषाणुचा संशयित रुग्ण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोना विषाणुचा फैलाव होवू नये यासाठी सरकारीसह खासगी इस्पितळांची मदत घेण्यात येत आहे. याबरोबरच वैद्य आणि कर्मचाऱयांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.
कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबत मंगळवारी जिल्हा पंचायत सभागृहात विविध धार्मिक प्रमुखांची आणि नेत्यांची विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मणहळ्ळी यांनी पत्रकारांशी बोलताना हि माहिती दिली. बेळगाव जिल्हय़ात जानेवारीपासून आतापर्यंत 54 जण परदेशातून आले आहेत. त्यापैकी तिघांजणांची 28 दिवसांचा तपासणी कालावधी पूर्ण झाला आहे. तर 8 जणांवर 14 दिवसांची देखभाल (तपासणी) प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर 41 जणांवर 14 दिवसांची प्रारंभिक देखभाल करण्यात आली आहे. यासर्व जणांवर त्यांच्या घरातच देखभालीची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक भासल्यास सरकारी इस्पितळात उपचार करण्यासाठी पूर्व तयारी करण्यात आली आहे. 14 दिवसांच्या या प्रक्रियेनंतर त्यांच्यामध्ये कोरोना विषाणुंचे लक्षण आढळून आल्यासच त्यांच्या रक्तांचे नमूने संग्रहित करुन प्रयोग शाळेला पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.
सिव्हील इस्पितळात आयसोलेशन वार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. याबरोबरच केएलई इस्पितळासह शहरातील काही खासगी इस्पितळ आणि तालुका इस्पितळातही आयसोलेशन वार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बोम्मणहळ्ळी यांनी यावेळी दिली.
जिल्हय़ातील सौंदत्ती येथील रेणुका देवी यल्लम्मा, चिंचली येथील मायक्का देवी, गोडची श्री वीरभदेश्वर आणि यडूर येथील वीरभद्रेश्वर मंदिरात दररोज भाविकांची गर्दी असते. कर्नाटकासह अन्य राज्यातील भाविकही या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मात्र खबरदारीच्या दृष्टीने मंदिर प्रशासकिय मंडळ आणि ट्रस्टीने भाविकांवर निर्बंध घालण्यासाठी आवाहन करावे, याबाबत पत्रके काढावीत अशी सुचना प्रशासकिय मंडळास करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱयांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र के. व्ही., शहर पोलीस आयुक्त लोकेशकुमार, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी आदी उपस्थित होते.