प्रतिनिधी/ सातारा
नोव्हेंबरच्या मध्यानंतर पुढे जाताना जिल्हय़ात कोरोना संसर्ग मंदावला असून गेली दोन दिवस तो 20 च्या नजिक स्थिर झालाय. तब्बल 10 महिन्यानंतर ही दिलासादायक स्थिती निर्माण झालेली असून यामध्ये दीपावलीच्या आठ दिवसाच्या सुट्टीनंतर लसीकरणाने चांगलीच गती घेतलीय. गत सोमवारपासून दैनंदिन 10 हजारांच्या पटीत लसीकरण सुरु असून जिल्हय़ात पहिला व दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या साडे 29 लाख झाली आहे.
दरम्यान, सोमवारी रात्रीच्या अहवालात 23 जणांचा अहवाल बाधित आला असून एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या 65 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने इंडियन कोव्हिड पोर्टलवरील नोंदीनुसार दिली आहे.
दुसरा डोस घेणाऱयांची संख्या वाढली
दीपावलीत लसीकरणाची गती मोठया प्रमाणावर मंदावली होती. मात्र दीपावली सुट्टीनंतर लसीकरणाने गती घेतली आहेत. त्यामुळे गेल्या 14 दिवस साडे आठ लाखांवर रेंगाळत असलेल्या दुसरा लसीकरणाचा डोस घेणाऱयांची संख्या 15 रोजी साडे नऊ लाखाच्या उंबरठयावर होती. दि. 16 रोजी दुसरा डोस घेणाऱया नागरिकांची संख्या 9 लाख 59 हजार 43 एवढी झालीय असून साडे नऊ लाखाचा टप्पा ओलांडला आहे. दुसरा डोस घेणाऱयांची संख्या वाढू लागली आहे.
मंगळवारी 15,823 जणांनी घेतली लस
दैनंदिन 10 हजारांच्या पटीत सुरु असलेला लसीकरणाचा सोमवारी वेग चांगला वाढला होता. तर मंगळवारी देखील दिवसभरात तब्बल 15 हजार 823 जणांनी लस घेतली आहे. यामुळे जिल्हय़ातील लस घेणाऱया नागरिकांची एकूण संख्या 29 लाख 48 हजार 037 एवढी झाली आहे. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 19 लाख 88 हजार 594 एवढी झाली असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 9 लाख 59 हजार 443 एवढी झालेली आहे.
फक्त साताऱयात दोन अंकी वाढ
सोमवारी रात्रीच्या अहवालात पाच तालुक्यात एकही नवीन रुग्ण वाढ झालेली नाही. यामध्ये पहिल्यांदाच कराड तालुका निरंक राहिला असून कराड कोरोनामुक्तीच्या उंबरठयावर उभे आहे. फक्त सातारा तालुक्यात 11 नवीन रुग्ण वाढ सोडता इतर सर्वच तालुक्यांची वाटचाल आता कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरु असून प्रत्येक तालुक्यात नागरिक लसीकरणास प्रतिसाद देवू लागल्याने लसीकरणाची गतीही वाढली असून त्यामुळे पॉझिटिव्हीटी दरात दिलासादायक घसरण झालेली आहे.