प्रतिनिधी/ गुहागर
रत्नागिरी जिह्यातील कोरोना परिस्थितीचा प्रतिदिनी शासकीय आढावा जाहीर केला जातो. त्याची पडताळणी केली असता जिह्यतील काही क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्ण संख्या दिसून येत नाही. ही रुग्ण संख्या जाणूनबुजून तर लपवली जात नाही ना, अशी शंका भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी व्यक्त केली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या कोवीड-19 कक्षाकडून 18 जुलै रोजी सायंकाळी 6 वा. जाहीर करण्यात आलेल्या आढाव्यात गुहागर तालुक्यातील क्वारंटाईन सेंटरबाबत कोणतीच माहिती नाही. मध्यंतरी गुहागर तालुका कोरोना शून्य झाला होता. मात्र आता गुहागर तालुक्यात ही संख्या 50पर्यंत पोहोचलेली आहे आणि त्याची नोंद शासकीय आकडेवारीत असणे अत्यावश्यक आहे. गुहागर तालुक्यातील कोरोनाबाधितांपैकी 17 रुग्ण हे वेळणेश्वर येथील कॉलेज वसतिगृहात, काही ग्रामीण रुग्णालयात, काही घरगुती विलगीकरणात आहेत. याची नोंद शासकीय आकडेवारी प्रसिद्धी पत्रकात नसल्याने मुंबईप्रमाणे कोरोनाबाधितांची संख्या लपवली जात असल्याची शंका नातू यांनी व्यक्त केली आहे. वेळणेश्वर येथील पर्यटन विकास महामंडळाचे संकुल असताना त्याचे उशिराने अधिग्रहण होऊनही आजपर्यंत रुग्ण दाखल नाही. मात्र भाडय़ाने घेतलेल्या व भाडे थकीत असणाऱया इंजिनिअरिंग कॉलेज वसतिगृहात 17 रुग्ण असल्याचा तालुक्यातील महसूल व आरोग्य विभागाचा गजब कारभार पहावयास मिळत असल्याचे ते म्हणाले.