प्रतिनिधी/ सातारा
गणेशोत्सवातील घरगुती गणपतींचे विसर्जन देखील सहकुटुंब सहभागी होवून ढोल-ताशांच्या निनादात करण्यात येत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरगुती विसर्जनासाठी फक्त दोनच व्यक्तींना परवानगी असल्याने कोणत्याही डामडौलाविना मोरयाचा जयघोष करत जिल्हावासियांनी मंगळवारी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना, बाप्पा, या कोरोनाच्या संकटातून आम्हा सर्वांना लवकर मुक्त कर, असे साकडे घातले. सातारा, कराड शहरात हौद ठेवून विसर्जनाची सोय करण्यात आली होती.
गणेशोत्सवास आरंभ झाल्यापासून जिल्हय़ातील कोरोना बाधित वाढीचा वेग दिलासादायक मंदावू लागल्याने घरगुती गणेशोत्सव व गौरी आगमन भक्तीपूर्ण व उत्साही वातावरणात घराघरात साजरे झाले. श्रींच्या आगमन अबालवृध्दांना भक्ती आणि शक्तीच्या विश्वात घेवून गेले होते. मंगळवारी जिल्हाभरात नागरिकांनी बाप्पा, तूच या कोरोनाच्या संकटातून आमची सुटका कर, अशी विनवणी करत गणरायांना भावपूर्ण निरोप दिला.
गेल्या पाच दिवसांपासून मुक्कामाला आलेल्या गणरायाच्या आगमनाने घराघरात उत्साही वातावरण निर्माण झाले होते. तर गौरीच्या आगमनांनी महिलांवर्गामध्ये मोठी लगबग दिसून येत होती. मंगळवारी गणराया व गौरी विसर्जनावेळी बाप्पाला निरोप देताना सर्वांनाच जड गेले. कोणत्याही मिरवणुकीविना बाप्पाला भक्तीभावाने निरोप देताना नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोनाचे सर्व नियम पाळले.
साताऱयात कृत्रिम तळय़ांसह हौदांची सुविधा
गणपतीचे विसर्जन करण्यासाठी सातारा नगरपालिकेने शहर परिसरात बुधवार नाका येथील कृत्रिम तळय़ासह राजवाडा येथील भवानी तलाव दगडी शाळा, न्यू इंग्लिश स्कूल, रामाचा गोट, फुटका तलाव, मंगळवार तळे, गोखले हौद, पंताचा गोट, तसेच गोडोलीतील आयुर्वेदिक गार्डन आणि हुतात्मा उद्यान, शाहूपुरीत ज्ञानवर्धिनी शाळासमोर, सदरबझारमध्ये करिअप्पा चौक येथे हौद ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणी विसर्जनासाटी भक्तांनी गर्दी केली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत अत्यंत भक्तिभावाने गणरायाला निरोप देण्यात आला.
पोलीस दलावरील ताण कमी
यावर्षी साधेपणात गणेशोत्सव साजरा होत असल्याने पोलीस दलावर असलेला ताण थोडा हलका झाला. मिरवणुका नाही, डॉल्बी नाही, मिरवणुकीला बंदी, घरगुती विसर्जनासाठी कुटुंबातील दोनच माणसे, मंडळांच्या विसर्जनासाठी पाच कार्यकर्ते या निर्बंधामुळे गणेशोत्सवातील जल्लोष गायब होवून फक्त भक्तीभाव उरला होता. मात्र, यामुळे पोलीस दलावरील बंदोबस्ताचा मोठा ताण कमी झाला होता.