वार्ताहर /माखजन :
कोकणात गणेशोत्सवाला येणाऱया चाकरमान्यांची गर्दी वाढत चालली असून गुरूवारी पहाटेपासूनच मुंबई-गोवा महामार्गावरील तपासणी नाक्यावर नाव नोंदणी आणि शिक्का मारण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळत होते. मात्र अपुरे कर्मचारी आणि चाकरमान्यांची वाढती संख्या यामुळे भरपावसात चाकरमान्यांना तासन्तास रांगेत उभे रहावे लागत होते.
गणेशोत्सवाला 22 ऑगस्ट रोजी प्रारंभ होत आहे. गेल्या शनिवारपासून कोकणात चाकरमानी दाखल होत आहेत. अखेरच्याक्षणी सरकारने विलगीकरणचा कालावधी चौदावरून दहा दिवसांचा करत एस.टी. बसेसही सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार 12 ऑगस्टपर्यत चाकरमान्यांना कोकणात येण्यासाठीची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात होणारी गर्दी लक्षात घेऊन चाकरमानी मिळेल त्या वाहनाने घर गाठू लागले आहेत. बुधवारी रात्रीपासून चाकरमान्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.
दरम्यान, गुरूवारी महामार्गावर त्या त्या तालुक्यासाठी उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर चाकरमान्यांच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. चिपळूण येथे यापूर्वी जिल्हा परिषद शासकीय विश्रामगृहात असणारा तपासणी नाका आता शिवाजीनगर बसस्थानकात नेण्यात आला आहे. त्यामुळे एस.टी.तून येणाऱया चाकरमान्यांना तेथेच नोंदणीसह शिक्का मारून तालुक्यात पाठवले जात आहे. संगमेश्वर तालुक्यासाठी आरवली जिल्हा परिषद शाळा क्र. 3 येथे तपासणी नाका आहे. गुरूवारी सकाळी दाखल झालेल्या चाकरमान्यांना या तपासणी नाक्यावर तब्बल तीन ते साडेतीन तास तिष्ठत रांगेत उभे रहावे लागले. मुसळधार पाऊस आणि लागलेली रांग यामुळे चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अगोदरच बुधवारी रात्री 7 वाजता सायन येथून खासगी बसमधून निघालेले चाकरमानी रायगड हद्दीतील कोलाडजवळ पूल बंदमुळे रखडले होते. त्यातच तपासणी नाक्यावरील रखडपट्टीमुळे सकाळी 9 वाजता आलेल्या चाकरमान्यांना दुपारी 3 वाजल्यानंतर देवरूख परिसरात पोहचले.