प्रतिनिधी / सातारा :
सातारा शहर परिसरात थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा गेले दोन दिवस पावसाने धुवाँधार बरसात सुरु केली असून जिल्हय़ातील पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्याने कोयना, उरमोडी, तारळी, धोम, कण्हेर धरणांच्या पाणी साठय़ात चांगली वाढ झाली आहे. कोयना धरणात गुरुवारी सायंकाळी 80 टी. एम.सी. पाणीसाठा असून सर्व धरणे 75 टक्केंच्या वर भरली आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, कोयना धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग केला जाणार असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सातारा शहर व तालुक्यात पावसाचा वेग मंदावला होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून थोडी विश्रांती घेत पावसाच्या धुवाँधार सरी कोसळत आहेत. यामुळे सातारा शहरातील जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. बाजारपेठेत तुरळक वर्दळ दिसत होती. एकीकडे कोरोनाची भीती आणि त्यातच पावसामुळे नागरिकांनी घरातच बसणे पसंद केले होते. गुरुवारी दिवसभर पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. त्यामुळे हवेत गारवा जाणवू लागला असून समाधानकारक पावसामुळे बळीराजाच्या चेहऱयावर आनंद दिसून येत आहे.
दरम्यान, तारळी धरणाच्या पाणीसाठय़ात वाढ झाली असून धरणामधील पाणीसाठा सांडवा पातळीपर्यंत (म्हणजेच 706.30 मी.) पोहोचल्यानंतर कोणत्याही क्षणी सुमारे 2000 क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रामध्ये सुरु होणार आहे. परिणामी धरणाच्या खालील बाजूस तारळी नदीमधील पात्रात पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. अशी स्थिती येथुन पुढे पर्जन्य कालावधीमध्ये केव्हाही उद्भवू शकते. त्यामुळे तारळी नदीकाठ लगत असलेल्या गावांतील ग्रामस्थांनी नदीपात्रामध्ये जाऊ नये अशी सूचना कार्यकारी अभियंता कण्हेर कालवे विभाग क्र. 2, करवडी (कराड) यांनी दिल्या आहेत. सध्या वीर धरणामधून नीरा नदी मध्ये 800 क्यसेक विसर्ग विद्युतगृहातुन सुरू आहे. धरणातून सोडण्यात येणाऱया विसर्गमध्ये वाढ करण्यात येणार असून पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी, नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तर उरमोडी, कण्हेर धरण परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला असून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 58 नवजा येथे 101 व महाबळेश्वर येथे 120 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. सातारा जिह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी. मध्ये व टक्केवारी कंसात पुढीलप्रमाणे. धोम 7.46 (63.78), धोम बलकवडी 3.41 (86.05), कण्हेर 7.33 (76.38), उरमोडी 8.44 (87.48), तारळी 4.32 (73.97), निरा-देवघर 6.91 (58.90), भाटघर 16.69 (71.03), वीर 9.20 (97.85).
गेल्या 24 तासात 14.69 मि.मी. पाऊस
जिह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 14.69 मि.मी. पाऊस झाला आहे. जिह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा 11.85 (528.13), जावली 27.35 (935.38), पाटण 20.82 (891.63), कराड 5.31 (405.69), कोरेगाव 7.22 (359.50), खटाव 3.59 (310.41), माण 0.14 (278.00), फलटण 2.56 (270.18), खंडाळा 8.75 (320.25), वाई 12.00 (500.69), महाबळेश्वर 123.08 (3255.26) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 8055.10 तर सरासरी. 732.28 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.