मंदिरे व घराघरात घटस्थापना : मंदिरांमध्ये नियम पाळण्याचे आवाहन : सार्वजनिक दुर्गोत्सवही साधेपणात
प्रतिनिधी /सातारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा झाला. यामध्ये घरगुती गणेशोत्सव सोडल्यास सार्वजनिक गणेशोत्सव नियम पाळूनच साजरा झाला. तर जिल्हय़ात गुरुवारी नवरात्र, दुर्गोत्सवाचा आरंभही साधेपणातच झाला असून सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांनी यावर्षी नियमांच्या बंधनाने खासगी जागेत देवीची छोटी मूर्ती प्रतिष्ठापणा करुन साधेपणात उत्सवास आरंभ केला आहे. मंदिरे उघडण्यास परवानगी देण्यात आल्याने ग्रामीण भागातील ग्रामदैवतांची मंदिरे तसेच घराघरात घटस्थापना करुन नवरात्रोत्सवास आरंभ झाला आहे.
शारदीय नवरात्र उत्सव दरवर्षी शरद ऋतूमध्ये अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होते. नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. यावर्षी शारदीय नवरात्री 7 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस भक्त दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करतात आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील केले जाते. असे मानले जाते की दुर्गा देवीची नऊ दिवस भक्तिभावाने पूजा केल्याने ती आनंदी होते आणि भक्तांचे सर्व त्रास दूर करते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 19 महिन्यांपासून बंद असलेली जिल्हय़ातील मंदिरे गुरुवारी नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी उघडण्यात आली. ग्रामीण भागात ग्रामदैवतांच्या मंदिरात घटस्थापना केली जाते व नऊ दिवस उपवास करुन अनवाणी राहून देवीची आराधना करण्याची परंपरा आहे. गुरुवारी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंदिराची साफसफाई केल्यानंतर तिथे कलशची घटस्थापना करण्यात आली. तर घराघरात देव्हाऱयासमोर घटस्थापना करुन नवरात्रोत्सवास जिल्हय़ात आरंभ झाला आहे.
मंडळांकडून छोटय़ा मूर्तींची प्रतिष्ठापणा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करण्याचे टाळावयाचे असल्याने सार्वजनिक दुर्गामाता मंडळांनी यावर्षी मोठय़ा स्वरुपातील उत्सवाकडे पाठच फिरवली आहे. दुर्गोत्सवात देवीची प्रतिष्ठापणा करुन नऊ दिवस सांस्कृतिक कार्यक्रम, दांडिया, गरबा, देवीची महाआरती, धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद असे कार्यक्रम होत असतात. मात्र, यावर्षी सातारा शहरासह जिल्हय़ात सार्वजनिक दुर्गामाता मित्रमंडळांनी खासगी जागेत छोटय़ा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करुन साधेपणात दुर्गोत्सवास आरंभ केला आहे.
उपवास व देवीची आराधना सुरु
हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र नवरात्रीपासून मानली जाते. त्याचबरोबर शारदीय नवरात्रीचेही वेगळे महत्त्व आहे. शारदीय नवरात्री असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवी पृथ्वीवर येते आणि पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते. देवीच्या आगमनाच्या आनंदात हे नऊ दिवस देशभरात दुर्गा उत्सव म्हणून मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. नऊ दिवसांमध्ये उपवास देखील केला जातो. गुरुवारपासून घरगुती नवरात्रोत्सवास भक्तीभावाने आरंभ झाला असून विजयादशमी म्हणजे दसऱयापर्यंत देवीची आराधना सुरु राहणार आहे.
नियम पाळून धार्मिक स्थळांना भेट द्यावी
राज्य शासनाने आजपासून राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे नागरिकांसाठी खुली केली या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱयातील दत्त मंदिर, पंचमुखी गणेश मंदिर व साईबाबा मंदिरात भेट देवून तेथील व्यवस्थेची पहाणी केली. धार्मिक व प्रार्थनास्थळांना भेटी देत असताना नागरिकांनी मास्कचा वापर, सामाजिक अंतर तसेच वेळोवेळी हाताची स्वच्छता ठेवावी व शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मंत्री देसाई यांनी केले आहे.