प्रतिनिधी/ रत्नागिरी
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱया चाकरमान्यांसाठी बुधवारपासून एस. टी. बस सोडण्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली होती. मात्र संपूर्ण कोकणात कोसळणाऱया मुसळधार पावसामुळे बुधवारी चाकरमान्यांचा बस सेवेला प्रतिसाद मिळू शकला नाही, परिणामी मुंबईतून एकही बस जिल्हय़ात आली नसल्याची माहिती एस.टी.महामंडळाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, गुरूवारी जिल्हय़ात काही बसेस दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बुधवारी मुंबईतून चाकरमान्यांना घेवून काही बसेस कोकणात दाखल होणार होत्या. विशेषत: पालघर, ठाणे, मुंबई आणि पुण्यातून या बसेस येणार होत्या. मात्र, तुरळक चाकरमान्यांनी प्रवासासाठी उत्सुकता दाखवली, मात्र पावसाचा जोर पाहता त्यांनीही घरी परतणे पसंत केले. त्यामुळे प्रवासीच नसल्याने मुंबईतून बसेस सोडण्यात आल्या नाहीत त्यामुळे जिल्हय़ात या भागातून एकही एस.टी महामंडळाची बस दाखल झाली नसल्याचे महामंडळाने स्पष्ट केले.
काही चाकरमान्यांनी खाजगी गाडय़ांनी कोकणाचा मार्ग धरला होता. मात्र जिल्हय़ात ठिकठिकाणी पाणी भरल्याने त्यांना अडकून राहावे लागले होते. बावनदी मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे, पर्यायी मार्गाने काही चाकरमान्यांनी जिल्हय़ात प्रवेश केला असला तरी मुंबईतसुध्दा मुसळधार पाऊस असल्याने चाकरमानी घराबाहेर पडले नसल्याची माहिती समोर आली आहे. गुरूवारी किती चाकरमानी येणार याकडे महामंळाचे लक्ष लागून राहिले आहे. गतवर्षी 1560 गाडय़ा जिल्हय़ात दाखल झाल्या होत्या. यंदा इतक्या मोठय़ा प्रमाणावर गाडय़ा येणार नाही कारण मुळात जिल्हय़ात सुमारे अडीच लाख चाकरमानी लॉकडाऊनच्या पहिल्या दुसऱया टप्प्यात गावी परतले आहेत. जवळपास 50 एक हजार चाकरमानी मुंबईत येण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे.