बेळगाव / प्रतिनिधी
देशातील सहा राज्यांमध्ये बर्ड-फ्लूचा शिरकाव झाला आहे. शेजारील राज्यांमध्ये बर्ड-फ्लू संक्रमित झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात पशुसंगोपन खात्याने खबरदारी म्हणून अनेक उपाय योजले आहेत. शनिवारी पशुसंगोपन खात्याच्या कार्यालयात अधिकाऱयांची बैठक पार पडली. यावेळी अधिकाऱयांना सूचना करण्यात आल्या. राज्यात बर्ड-फ्लूचे एकही प्रकरण आढळून आले नसले तरी खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले.
खबरदारीचा उपाय म्हणून परराज्यांतून होणाऱया पक्ष्यांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हय़ातील पशुवैद्यकीय अधिकारी व इतर अधिकाऱयांना गावोगावी फिरून सर्व्हे करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून याची लक्षणे दिसून आल्यास तातडीने नमुने घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी बर्ड फ्लूचे दुसरे संकट उभे ठाकले आहे. बर्ड-फ्लूमुळे काही राज्यांमध्ये पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामळे प्रशासन नजर ठेवून असल्याची माहिती पशुसंगोपन खात्याचे उपनिर्देशक अशोक कोळ्ळा यांनी दिली.
बर्ड-फ्लू हा पक्ष्यांशी संबंधित असल्याने चिकन खवय्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता ग्राहकांनी अंडी व चिकन सेवन करावे, अशी माहितीही खात्याने दिली आहे. राज्यात अंडी व चिकन विक्रीवर निर्बंध घालण्यात आले नाहीत, असे पशुसंगोपन मंत्री प्रभू चौहान यांनी स्पष्ट केले आहे.
शेजारील केरळ राज्यात सध्या बर्ड-फ्लूचा प्रसार सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी चार सीमावर्ती जिह्यांना हाय अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांनी खबरदारी म्हणून मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, अशी माहिती खात्याने दिली आहे.