नवे 125 रूग्ण, आणखी दोघांचा मृत्यू, 2700 जणाची कोरोनावर मात
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून सोमवार सायंकाळपासूनच्या 24 तासांत नवे 125 रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील कोरोनाबाधीतांच्या संख्येन 4 हजारचा टप्पा ओलांडला आहे. दुसरीकडे आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनाबाधीत मृतांची संख्या 137 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 2700 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोनामुळे उपचार घेत असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील 90 वर्षीय रूग्णाचे निधन झाले असून तालुक्यातील हा 12 वा बळी आहे. लांजा तालुक्यातील 55 वर्षीय रूग्णाचाही उपचारादम्यान मृत्यू झाला असून तालुक्यातील कोरोनाचा हा चौथा बळी ठरला आहे. जिल्हय़ात कोरोना बळींची संख्या 137 झाली असून मृत्यूचे प्रमाण 3.37 टक्के आहे.
बुधवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 125 नवे रूग्ण आढळले आहेत. यामध्ये आरटीपीसीआर चाचणीमध्ये रत्नागिरीत 16, चिपळूण 13, खेड 10, गुहागर 8, मंडणगड, दापोली व लांजात प्रत्येकी 2 असे 53 पॉझीटीव्ह रूग्ण आढळले आहेत. तर ऍन्टीजेन चाचणीत खेडमध्ये 27, चिपळूण व रत्नागिरीत प्रत्येकी 19, लांजात 4 व गुहागरात 3 असे 72 नवे रूग्ण सापडले आहेत. नव्या 125 रूग्णांमुळे कोरोना बाधीतांची एकूण संख्या 4 हजार 57 झाली आहे.
आणखी 55 जण बरे
कोरोनावरील उपचारानंतर आणखी 55 जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयातून 19 माटे हॉल चिपळूण 9, कळंबणी 7, समाजकल्याण रत्नागिरी व घरडा हॉस्पिटल प्रत्येकी 5, पोलीस हेडक्वार्टर 3, महिला रूग्णालय, कामथे रूग्णालय व शिवश्री रूग्णालय रत्नागिरीतून प्रत्येकी 2, आयटीआय रत्नागिरी येथील एकाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 2700 झाली आहे. जिल्हय़ात संस्थात्मक विलगीकरणात 95 जण तर 7 हजार 295 जण होम क्वारंटाईन असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.