1 कोटी 58 लाख 76 हजारांचा निधी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी गळती रोखण्यासाठी शासनाकडून सर्व मुलींसह एसटी, एनटी आणि दारिद्रय़रेषेखालील मुलांना मोफत गणवेश वाटप करण्यात येते. या योजनेंचा यावर्षी जिल्ह्य़ातील 52 हजार 920 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला असून त्यासाठी 1 कोटी 58 लाख 76 हजार रुपये निधी खर्च झाल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
शासनाकडून मोफत पाठय़पुस्तकांसह मोफत गणवेशासाठी विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होते. नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी 100 टक्के पटनोंदणी, 100 टक्के उपस्थिती, गळतीचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी मोफत पाठय़पुस्तके, गणवेश, शालेय पोषण आहार आदी योजना राबवण्यात येत आहेत. एका शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला 2 गणवेश देण्याची तरतूद आहे.
गणवेशाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी विद्यार्थ्यांची बँकेत खाती उघडण्याच्या कार्यवाहीत अडचणी उभ्या ठाकल्यामुळे शाळास्तरावर त्यांना लाभ देण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. यंदा कोरोना काळात शाळा सुरु नसूनही जि. प. शाळातील मुलांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यावर्षी कोरोनामुळे शाळा सुरु नसल्याने गणवेश वाटपाबाबत प्रश्न उभा होता. प्रारंभी गणवेश निधीत कपात होऊन कालांतराने गणवेशासाठी 1 कोटी 58 लाखाचा निधी प्राप्त झाला. हा निधी शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग करण्यात आला. त्यातून प्रत्येक विद्यार्थ्याला 300 रुपये प्रमाणे रक्कम देण्यात आली.
2 हजार 572 शाळांमध्ये कार्यवाही
जिल्हा परिषदेच्या 2 हजार 572 शाळा आहेत. त्यामध्ये 72 हजार विद्यार्थी असून त्यातील 38 हजार 819 मुलींसह एससी वर्गातील 3 हजार 51, एसटीमधील 1 हजार 27 आणि दारिद्रय़रेषेखालील 10 हजार 123 मुलांना गणवेश मोफत योजनेचा लाभ दिला गेला आहे.