प्रतिनिधी/ सातारा
आपल्या देशात प्रतिवर्षी दि. 16 मार्च हा राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरा केला जातो. सध्या आपल्या देशात सर्वत्र कोविड-19 लसीकरण मोहिम देखिल सुरू आहे. त्याच अनुषंगाने या दिनाचे औचित्य साधुन सर्वांना कोविड-19 लसीकरणाचे महत्व देखिल विविध माध्यमातुन पटवुन देण्यात येत होते.
जगातील सर्व नागरिकांना लसीचे महत्व माहित आहे. विशेषतः कोविड-19 साथीच्या रोगा दरम्यान प्रत्येकाला लसीचे महत्व पटले आहे. प्राणघातक आणि धोकादायक आजार रोखण्यासाठी लस हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. आज जगभरात मोठय़ा प्रमाणात लसीकरण मोहिमेमुळे गोवर, टिटॅनस सारख्या अत्यंत संसर्गजन्य आणि धोकादायक आजारांचा नाश झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारी नुसार प्रतिवर्षी 2-3 दशलक्ष लोकांचे जीव हे वाचतात. राष्ट्रीय लसीकरण दिन प्रथम 16 मार्च 1995 रोजी साजरा करण्यात आला. या दिवशी पोलिओ लसीचा पहिला डोस भारतात देण्यात आला होता.
मागील संपुर्ण वर्ष हे लॉकडाऊन व कोरोना काळात गेले, तरी देखिल आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सरकारतर्फे देण्यात येणारे गरोदर महिला 0 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांना लसीकरण मोहिम अविरत पणे सुरू होती. त्याचबरोबर संबंधितांनी लस घेतली की नाही याची खातरजमा देखिल या अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यां यांच्यातर्फे नियमितपणे करण्यात येत होती.
आवर्जुन लसीकरण करुन घ्यावे
लसीकरण हे सध्या काळाची गरज बनली आहे. त्यामुळे 0 ते 5 वर्षाच्या वयोगटातील मुलांच्या पालकांनी आपल्या बालचमुंना आवर्जुन संबंधित लसीकरण करूण घ्यावे. त्याचप्रमाणे कोविड-19 लसीकरण देखिल आरोग्य सेवकांनी, प्रंटलाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षावरील व्याधिग्रस्तांनी आवर्जुन करून घ्यावे.