प्रतिनिधी / सातारा :
जिल्हय़ात एप्रिल महिन्यापासून सुरु असलेला कोरोनाचा हाहाकार मे महिन्याच्या आरंभापासून सुरुच आहे. उलट बाधित वाढ व मृत्यूदरात नवनवीन उच्चांक होत असल्याने जिल्हय़ात पॅनिक वातावरण निर्माण झालेले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रशासनासमवेत तातडीची बैठक घेवून लॉकडाऊन कडक करण्यासंदर्भात निर्णय घेतला. सायंकाळी प्रभारी जिल्हादंडाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी नवीन आदेश जारी केले असले तरी यामध्ये लॉकडाऊनला फक्त कडकतेचा मुलामा देण्यात आल्याचे दिसत आहे.
लॉकडाऊन असूनदेखील सातारा जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत दि. 4 ते 10 रोजीपर्यंत लॉकडाऊनचा नव्याने आदेश जाहीर करण्यात आला आहे. मात्र, जुन्याच लॉकडाऊनला कडकचा मुलामा देण्यात आलेला असून यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने, कृषी, हॉटेल, रेस्टारंट व मद्यविक्री सकाळी 7 ते 11 या वेळेत घरपोच देण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, दुकाने बंदच राहतील असे आदेश म्हटले आहे.
ब्रेक द चेन अंतर्गत 4 मे पासून 10 मे पर्यंत जिल्हादंडाधिकारी यांनी सुधारित आदेश सोमवारी सायंकाळी जारी केले आहेत. यामध्ये त्यांनी किराणा, फळे, भाजीपाला, बेकरी, डेअरी, मिठाई, खाद्य पदार्थ दुकाने बंद राहतील असे म्हटले आहे. मात्र, सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी यांसह), पाळीव प्राण्यांच्या खाद्य पदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित साहित्याच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने पुर्णपणे बंद राहतील. तथापि, या दुकानांची घरपोच सेवा सकाळी 7 ते सकाळी 11 या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी राहील, असेही नमूद केलेले आहे.
कृषी अवजारे व शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने सकाळी 7 ते सकाळी 11 या कालावधीतच चालू राहतील. तथापि, सदर दुकानांची घरपोच सेवा सकाळी 7 ते सायंकाळी 5 या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी राहील. हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्री दुकाने यांची घरपोच पार्सल सेवा दुपारी 12 ते रात्री 8 वाजेपर्यतच सुरू राहतील. तसेच त्यासंबंधित इतर बाबींना दि. 14 एप्रिल 21 रोजीचे आदेश लागू राहतील.
घरपोच मद्य विक्री बाबत दि. 20 रोजीच्या आदेशामध्ये नमूद कालावधीमध्ये दुपारी 12 ते सायंकाळी 5 असा बदल करण्यात येत असून या आदेशातील इतर सर्व बाबी कायम राहतील, असे आदेशात नमूद केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द दंडनीय, कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही असा इशारा देण्यात आलेला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्हय़ातील रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. रोज सुमारे दोन हजारांच्या संख्येने नव्या रुग्णांची भर पडत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण आला असून नव्याने कोविड सेंटर उभी करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे.
उद्देश जनता कर्फ्यूचा पण स्पष्ट आदेश नाही
लॉकडाऊन असून देखील रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये. यासाठी कडक लॉकडाऊन निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, प्रशासनाच्या आदेशात तशा पध्दतीने स्पष्टपणे काहीही नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे जुन्याच लॉकडाऊनला कडकचा मुलामा असून बुधवारपासून याची अंमलबजावणी होणार आहे. वैद्यकीय सेवा मेडिकल आणि दूध व्यवसाय वगळता अन्य सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. या निर्णयाचे उल्लंघन करणाऱयांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.