किराणी, भाजी, फळे, मटणसह अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
प्रतिनिधी/ सातारा
शुक्रवारी रात्री आठपासून सोमवारी सकाळी सातपर्यंत विकेंड लॉकडाऊनला प्रारंभ झाला. पुढील दोन दिवस वैध कारणाशिवाय नागरिकांना घरातून बाहेर पडता येणार नाही. विशेष म्हणजे किराणा, भाजी, फळे, मटणसह अत्यावश्यक सेवा पुढील दोन दिवस सुरू राहणार आहेत. नागरिकांनी वैध कारण असल्यासच घराबाहेर पडावे,असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. पुढील दोन दिवस बाजारात कमीत कमी गर्दी असेल, असे नियोजन प्रशासनाने केले असून नागरिकांना घराबाहेर पडल्यास त्याचे कारण प्रशासनाकडून विचारले जाणार आहे. दरम्यान, सकाळी आलेल्या अहवालात 716 बाधित असून 8 मृत्यू झाले आहेत. 362 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवा सुरू पण नागरिकांना प्रतिबंध
अत्यावश्यक सेवेमधल्या ज्या ज्या बाबी आहेत, त्या शनिवार व रविवारीसुद्धा शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार सुरु राहणार आहेत. किराणा, भाजी, फळे, मटण, चिकनसह मेडीकल शॉप्स आदी अत्यावश्यक बाबी पुढील दोन दिवसांत निर्धारित वेळेत सुरू राहणार आहेत. रेस्टॉरंट व बारमध्ये सोमवार ते शुक्रवार पार्सल सेवा सुरु होती मात्र, शनिवारी व रविवारी ही पार्सल सेवा घ्यायला नागरिकांना बाहेर पडता येणार नाही परंतु रेस्टॉरंट व बार यांना घरपोच सेवा देता येऊ शकते. ई-कॉमर्स, शेती संबंधित कामे यांना बंधने नाहीत. जिह्यातील उद्योगही 7 दिवस सुरु राहणार आहेत. शिफ्टमध्ये काम करतात, अशा उद्योगातील कर्मचाऱयांनी आपल्या कंपनीचे फोटो असलेले ओळखपत्र सोबत ठेवावे. त्यांना शनिवार व रविवारी कामावर जाण्यासाठी अडविण्यात येणार नाही.
जमावबंदी आदेश सातही दिवस लागू
शासनाने 30 एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा जमावबंदी आदेश आठवडय़ाच्या 7 दिवसांसाठी लागू राहणार आहे. 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. नाईट कर्फ्यमध्ये लोकांना वैध कारणांशिवाय संचार करता येणार आहे. तसाच तो विकेंड लॉडडाऊनमध्येही वैध कारणाशिवाय करता येणार नाही, असे जिल्हाधिकाऱयांनी कळवले आहे.
उर्वरित दुकानदारांनीही प्रशासनास सहकार्य करावे
लग्नग्न समारंभासाठी तहसीलदार याची परवानगी घ्यावी. 50 पेक्षा जास्त लोकांनी लग्न समारंभास उपस्थित राहू नये. कोणी याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. याचे ग्रामीण भागातील नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. ज्यांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून सामाजिक संस्थांनी यासाठी मदत करावी. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून इतर दुकाने बंद आहेत, अशा दुकानदारांनी यापूर्वी जसे सहकार्य केले होते, त्याचप्रमाणे यावेळी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
खासगी डॉक्टरांनी रेमडेसिवीरचा वापर प्रोटॉकॉलप्रमाणेच करावा
रेमडेसिवीरचा औषध हे कोरोना संसर्ग रुग्णाच्या नातेवाईकांच्या दबावाखाली दिले जात आहे. तसे न करता डॉक्टरांनी प्रोटॉकॉलप्रमाणे रेमडेसिवीरचे औषध द्यावे. जिह्याला रेडिमसनचा पुरवठा 100 टक्के होईल व रुग्णांना सहजरित्या उपलब्ध होईल, यासाठी पालकमंत्री व लोकप्रतिनिधींच्या माध्यतातून प्रयत्न करीत आहोत. रेमडेसिवीरच्या औषधाबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी घाबरुन जाऊ नये. गरज असेल तर कोरोना संसर्ग रुग्णास डॉक्टर रेमडेसिवीरच औषध देतील. रेमडेसिवीरच्या औषधासाठी लवकरच कक्ष स्थापन करुन या कक्षाच्या माध्यमातून निरसन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह सांगितले आहे.
716 रूग्ण वाढले
जिह्यात कोरोना रूग्णवाढीबरोबरच मृत्यूदरातही धक्कादायक वाढ होत आहे. गुरूवारी चोवीस तासात 9 रूग्णांना जीव गमवावा लागला तर शुक्रवारी आलेल्या अहवालात 8 रूग्णांचा कोरोनाने बळी गेला. 716 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. यात सर्वाधिक वाढ सातारा शहर व तालुक्यात झाली असून 173 रूग्ण आढळले आहेत. कराड तालुक्यात 137, फलटणला 76, खटावला 67, माणला 37, कोरेगावला 35, पाटणला 32, खंडाळा 15, वाई 60, महाबळेश्वर 32, जावली तालुक्यात 33 रूग्ण वाढले आहेत.
40 वर्षीय दोघांसह आठ मृत्यू
गेल्या चोवीस तासात आठ बाधितांचा मृत्यू झाला असून यात 40 वर्षे वय असणारे दोघे आहेत. स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील उकीर्डे (ता. माण) येथील 80 वर्षीय पुरुष, गोडोली (ता. सातारा) येथील 40 वर्षीय पुरुष, आरफळ (ता. सातारा) 40 वर्षीय पुरुष, दुर्गापेठ (ता. सातारा) येथील 80 वर्षीय पुरुष, कुडाळ (ता. जावली) येथील 52 वर्षीय महिला व जिह्यातील विविध खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये ढोकळेवाडी (ता. खटाव) येथील 65 वर्षीय पुरुष, पंताचा गोट (ता. कराड) येथील 78 वर्षीय पुरुष, पारगाव (ता. औंध, जि. पुणे) येथील 48 वर्षीय पुरुष अशा एकूण 8 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
362 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 362 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.