आजही अतिवृष्टीचा इशारा : आंबोली घाटात किरकोळ दरडी : अनेक भागात भातशेती पाण्याखाली
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात रविवारपासून सुरू झालेला पाऊस सोमवारीही मुसळधार कोसळला. त्यामुळे कुडाळ तालुक्यातील आंबेरी व वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा पुलावर पाणी आले होते. मंगळवारीही हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. समुद्री किनारी ताशी 45 ते 55 कि. मी. वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करून निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी जिल्हय़ातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याने दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्हय़ात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिला होता. आंबोली येथे दरडी कोसळण्याची किरकोळ घटना घडली आहे. सोमवारी दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. मात्र मंगळवारीही अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अतिवृष्टी काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकाऱयांनी केले आहे. आपत्कालीन परिस्थितीवेळी जिल्हा नियंत्रण कक्षाशी (02362-228847) संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
वेंगुर्ल्यात भातशेतीचे नुकसान
वेंगुर्ले : तालुक्मयात सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस झाला. यामुळे ठिकठिकाणी काही पुलांवर पाणी आल्याने मार्ग ठप्प झाले होते. भात कापणीच्या तोंडावर असताना पावसाने जोर धरल्याने भातशेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.
सावंतवाडीत ढगफुटीचा प्रत्यय
सावंतवाडी : रविवारी रात्रीपासून तुफान कोसळणाऱया पावसामुळे सावंतवाडीकरांनी ढगफुटीचा अनुभव घेतला. सोमवारी सकाळीही मुसळधार पाऊस सुरू होता. बाजारपेठ व सालईवाडा परिसरात पाणीच पाणी झाले होते. तब्बल दोन तासाहून अधिक वेळ रस्त्यावर पाणी होते. बाजारपेठेत पाणी घुसल्याने व्यापाऱयांची धांदल उडाली.
रविवारी दुपारपासून तालुक्यात सुरू झालेल्या पावसाने सोमवारीही नॉनस्टॉप खेळी सुरुच ठेवली. रात्रभर धुवाधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे काही भागात नदी-नाल्याना पाणी आले होते. सकाळी सावंतवाडी शहरात ढगफुटीचा प्रत्यय आला. बाजारपेठेत व सालईवाडा भागात रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. आंबोली, चौकुळ, कलंबिस्त सांगेली, सावरवाड, कारिवडे, कुणकेरी, दाणोली भागात नॉनस्टॉप पावसामुळे भातशेती पाण्याखाली गेली होती. तेरेखोल नदीलाही पूर आला आहे. सावंतवाडीतील पाळणेकोंड, माडखोल, कारिवडे, सांगेली-सनमटेंब, वाफोली, आंबोली धरणे तुडुंब भरून वाहत आहेत.
परराज्यातील नौका देवगड बंदरात
देवगड : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळीसदृश स्थितीमुळे मासेमारीसाठी खोल समुद्रात असणाऱया परराज्यातील सुमारे 75 यांत्रिकी नौका देवगड बंदरात सोमवारी सकाळपासून आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत. यामध्ये जिल्हय़ातील मालवण येथील नौकाही दाखल झाल्या आहेत.सकाळपासून समुद्रात मोठय़ा प्रमाणात धुक्याचे साम्राज्य निर्माण झाले होते. किनाऱयावरून खोल समुद्रातील कोणताच भाग दिसत नव्हता. त्यातच पहाटेपासूनच पावसानेही जोर धरला होता. यासर्व परिस्थितीचा अंदाज घेत मच्छीमार नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. देवगडचे बंदर अधिकारी रवींद्र मालवणकर म्हणाले, गुजरात राज्यातील नौकांवरील खलाशी, कर्मचारीवर्गाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किनाऱयावर उतरू दिले जाणार नाही. तसेच नौकांमध्येही अंतर ठेवण्याची दक्षता घेण्यात येत आहे. मालवणमधील सुमारे 15 नौका तसेच रत्नागिरी नाटे येथील नौकाही बंदरात दाखल झाल्या आहेत. सागरी सुरक्षा विभागाच्यावतीने या नौकांमधील खलाशी व इतरांच्या ओळखपत्रे व कागदपत्रांची माहिती उशिरापर्यंत घेण्याचे काम सुरू राहील, असे ते म्हणाले.
आंबोली घाटात किरकोळ दरड
आंबोली : आंबोलीत चौकुळ परिसरात रात्रीपासून कोसळणाऱया धो-धो पावसामुळे पूर्वीचा वस मंदिराच्या खालील बाजूला 40 फुटाच्या मोरीजवळील दरडीचा काही भाग रस्त्यावर आला. सुदैवाने कोणत्याही वाहन चालकाला इजा झाली नाही. वाहन चालक आणि पोलिसांनी दरडीतील छोटे दगड बाजूला करून वाहतूक पूर्ववत सुरू केली. पाऊस सुरू झाल्यापासून साधारण जून महिन्यापासून ते आजवर तीन ते चारवेळा या ठिकाणचा दरडीचा भाग कोसळून रस्त्यावर आला. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. चौकुळ गोणसाटवाडी कॉजवे पुलावर पाणी आल्याने येथील वाहतूक काही काळ बंद होती तसेच नेनेवाडी पुलावर, चौकुळ पाणंदवाडीकडे जाणाऱया छोटय़ा कॉजवेवर पुराचे पाणी आल्याने या वाड गावाशी संपर्क काही काळ तुटला होता. तर पापडी पुलापर्यंत पाणी आल्याने चौकुळ-मळववाडी परिसरातील लोकांमध्ये भीती निर्माण झाली.