वैद्यकीय सेवा वगळता सर्वत्र बंद : बाजारपेठा, रस्ते ओस : वाळू वाहतूक मात्र सुरू
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या विकेंड लॉकडाऊनला शनिवारी जिल्हय़ात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वैद्यकीय सेवा वगळता सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. रस्ते ओस पडले होते, वाहतूक सेवा बंद होती. त्यामुळे मुंबईहून आलेल्या रेल्वे प्रवाशांना पायपीट करावी लागली. सर्वत्र कडक लॉकडाऊन असताना वाळू वाहतूक मात्र सुरू होती.
दरम्यान विकेंड लॉकडाऊनला जिल्हय़ातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जनतेचे आभार मानले. रविवारीही कडक लॉकडाऊन पाळण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱयांनी केले.
संपूर्ण राज्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शनिवार, रविवार हे दोन दिवस कडक लॉकडाऊन आणि इतर दिवशी कडक निर्बंध लावले आहेत. ‘विकेंड’ सोडून इतर दिवशी लागू केलेले निर्बंध कुणी फारसे गंभीरपणे पाळताना दिसत नव्हते. आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आवाहन करूनही अनेक ठिकाणी आठवडा बाजार भरले. त्यामुळे विकेंड लॉकडाऊनला प्रतिसाद मिळणार की नाही, याबाबत शंका होती. मात्र विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी सिंधुदुर्ग जिल्हय़ात कडकडीत बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आला.
शनिवारी वैद्यकीय सेवा वगळता सर्वत्र कडकडीत बंद होता. जिल्हय़ातील सर्वच बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. ‘मेडिकल स्टोअर’ही क्वचित ठिकाणी सुरू होते. अत्यावश्यक सेवा म्हणून अपवादात्मक परिस्थितीमध्ये ऑटो रिक्षांना परवानगी देण्यात आली होती. परंतु, कुणी प्रवासी नाही म्हटल्यावर ऑटोरिक्षाही बंद होत्या. प्रवासी नसल्याने एसटीसुद्धा बंद होत्या. सर्व रस्ते ओस पडले होते. रस्ते, बाजारपेठा निर्मनुष्य झाल्या होत्या. अत्यावश्यक सेवातील आरोग्य कर्मचारी, वायरमन मात्र काम करताना दिसत होते.
कुठेही अनुचित प्रकार घडू नये, लॉकडाऊनचे कडक नियम पाळले जावेत, यासाठी बाजारपेठा, नाका अशा ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हय़ाच्या प्रवेशद्वारावरसुद्धा बंदोबस्त होता. पोलिसांची गस्ती पथकेही तैनात होती. कुठेही अनुचित प्रकार न घडता शांततेत लॉकडाऊन पाळण्यात आला.
प्रवासी वाहतूकही बंद होती. ऑटोरिक्षाही बंद होत्या. त्यामुळे मुंबई व इतर ठिकाणाहून रेल्वेने आलेल्या प्रवाशांना पायपीट करीत घर गाठावे लागले. त्यामुळे काही वेळ रेल्वेस्थानकावर गर्दी झाली होती. जिल्हय़ात सर्वत्र कडक लॉकडाऊन सुरू असताना वाळू वाहतूक मात्र राजरोस सुरू होती. वाळूने भरलेले अनेक डंपर गोव्याच्या दिशेने जात होते. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले.