जिल्हा प्रशासनस्तरावरून अजून निर्णय नाही. 26 जानेवारीच्या पालकमंत्र्यांच्या बैठकीतील निर्णयाकडे लक्ष
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग येत्या सोमवार 24 जानेवारीपासून सुरु करण्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. मात्र जिह्यात या शाळा सुरू होण्याबाबत अजूनही कोणताच निर्णय प्रशासनस्तरावरून झालेला नाही. या बाबत येत्या 26 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन निर्णय होण्याची शक्यता जि. प. शिक्षण विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा, महाविद्यालये पुढील 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद करण्याचे आदेश दिले होते. पण राज्यातील कोरोनाचा कमी प्रादुर्भाव असलेल्या भागातील शाळा सुरु करण्याबाबत सातत्याने मागणी होत होती. तसेच शाळा व महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात राज्याच्या शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्याकडे प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सहमती दर्शवली. त्यामुळे येत्या सोमवारपासून पहिली ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली.
शालेय शिक्षण विभागाने त्यासाठी शाळा व महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. या नियमांचे पालन करुनच शाळा सुरु करण्यात येणार आहेत. शाळा सुरु करत असताना संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेवून आणि खबरदारी घेतच शाळा सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे सर्व अधिकार जिल्हा प्रशासनाला दिल्याने अजूनही या बाबत प्रशासनस्तरावर शाळा सुरू करण्याची कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. जिल्हाधिकारी प्रशासनाकडून अजूनही कोणतेच आदेश दिले नसल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. येत्या 26 जानेवारीला रत्नागिरीत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱया आढावा बैठकीनंतर शाळा सुरू करण्याबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे जिल्हय़ात शाळा सुरु होण्याबाबत अजूनही शिक्षक, पालक, विद्यार्थीवर्गाला प्रतीक्षा करावी लागणार आहे.