7 हजार लाभार्थ्यांचे आधार लिंकिंग शिल्लक
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक न केल्यास रेशन बंद होणार असल्याची माहिती राज्याच्या अन्नधान्य पुरवठा अधिकाऱयांनी दिली होती. रत्नागिरी जिल्हय़ात अंत्योदयच्या आधार लिंक 86.80 तर प्राधान्य रेशनकार्डच्या आधार लिंक अपडेटचे काम 87.50 टक्के झाले आहे. उर्वरित रेशनकार्डधारकांना आधार अपडेट करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. याचवेळी आधार लिंक आहे, मात्र सलग 5 महिने धान्य उचल न केल्याने तब्बल 15 हजार 161 रेशनकार्डधारकांचे धान्य बंद करण्यात आल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागाने दिली.
केंद्र शासनाच्या आदेशानुसार रेशनकार्डावर धान्याचा लाभ घेणाऱया सर्व रेशनकार्डधारकांना आपला आधार क्रमांक लिंक करणे बंधनकारक आहे. आतापर्यंत जिल्हय़ात 3 लाख 49 हजार 390 लाभार्थ्यांचं आधार लिंक पूर्ण झाले आहे. मात्र अद्यापही 6 हजार 642 अधिक लाभार्थीचे आधार लिकींग बाकी आहे. याशिवाय 15 हजार 161 रेशनकार्डधारकांनी ऑगस्ट ते डिसेंबर या 5 महिन्यात कोणत्याही प्रकारे धान्य उचल केली नाही. त्यामुळे शासनाकडूनच यांना धान्य पुरवठा बंद करण्यात आला आहे. मात्र त्यांना धान्य हवे असेल तर कागदपत्रांची पडताळणी करून व एक अर्ज घेवून शिधापत्रिका उचित योजनेत वर्ग कराव्यात, अशा सूचना अन्न पुरवठा विभागाच्या सचिवांकडून करण्यात आल्या आहेत.
रेशनकार्डातील प्रत्येक सदस्याने रेशन दुकानावर आपले आधार कार्ड घेवून जाणे आवश्यक आहे. आधार कार्डावरून रेशन आधारसोबत लिंक केले जाणार आहे. यासाठी कार्डधारकाचा हाताचा ठसाही स्कॅन केला जाणार आहे. कुटुंबातील एक व्यक्तीचा मोबाईल नंबरही द्यावा लागतो. स्वस्त धान्याचा लाभ गरजू व्यक्तींना मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे बोगस रेशनधारक उघड येणार आहेत.