प्रतिनिधी
रत्नागिरी / ऐन भातशेती हंगामात जिल्हय़ात शेतकऱयांची खत मिळवण्यासाठी होणारी धावाधाव आता थांबणार आहे. जिल्हय़ासाठी आवश्यक असलेले सुमारे 1500 मेट्रीक टन खत सोमवारी रेल्वेच्या मालगाडीने दाखल झाले. येत्या दोन दिवसात खताची आणखी एक मालगाडी दाखल होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाने दिली.
भातशेतीचा हंगाम बहरात आला असतानाच जिल्हय़ात खताची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. जिल्हय़ात पेरण्यांची सुमारे 80 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. पेरणीनंतर रोपांना खताची मात्रा देणे आवश्यक आहे. शेतीसाठी खत उपलब्ध व्हावे यासाठी शेतकऱयांची धावाधाव सुरू झाली होती. मात्र 1500 मेट्रीक टन खत दाखल झाल्याने शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे.
लॉकडाऊनमुळे खत उतरण्यासाठी मजूरांचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे रेल्वेतून येणारे खत रत्नागिरी स्थानकात उतरण्यासमोरही अडचण उभी राहिली होती. पहिल्या तीन गाडय़ा सोडल्यानंतर आरसीएफकडून खताची गाडीच पाठविण्यात आलेली नव्हती. त्यामुळे जिल्हय़ात खतांची टंचाई निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे. कृषी विभागानेही मजूर उपलब्ध करुन रत्नागिरीत खत उतरवण्यासाठी पावले उचलली होती.
खत उतरण्यासाठी मजूरांची नोंदणी झाल्यानंतर रत्नागिरी रेल्वेस्थानकात सुमारे 1500 मेट्रीक टन खत मालगाडीने दाखल झाले आहे. त्यामध्ये 750 मे. टन युरिया तर 800 मे. टन सुफला खताचा समावेश आहे. या खताचा जिल्हय़ातील शेतकऱयांना लवकरात लवकर पुरवठा होण्यासाठी तालुकास्तरावर नियोजन करण्यात आले आहे. खताच्या पुरवठय़ासाठी संबधित कृषी सहाय्यकांमार्फत कार्यवाही सुरू आहे. ट्रकमध्ये खत भरुन ते सोसायटींमार्फत गावागावात वितरीत केले जाणार असल्याचे जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी विनोद शेंडय़े यांनी सांगितले. रेल्वे मालगाडीने दाखल झालेल्या खतामुळे जिल्हय़ात निर्माण झालेला खत प्रश्न आता लवकरच निकाली निघणार आहे.