प्रतिनिधी/ रत्नागिरी
शासन स्तरावरून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय होऊनही रत्नागिरी जिल्हय़ातील शाळांना जिल्हा प्रशासनाच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. शाळा व्यवस्थापन समित्यांच्या बैठकांनुसार आतापर्यंत जिह्यातील 2,522 पैकी 2400 हून अधिक शाळांनी प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याला संमती दिली आहे.
जिल्हय़ातील शाळा सुरू करण्याबाबत शाळास्तरावरील निर्णयाची माहिती उद्या 26 जानेवारीला जिल्हय़ाचे पालकमंत्री ऍड. अनिल परब यांना देण्यात येणार आहे. त्यावेळी शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा पातळीवरील महत्वपूर्ण निर्णय होणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 95 टक्के शाळा व्यवस्थापन समित्यांनी प्रत्यक्ष अध्यापन सुरु करण्यास संमती दर्शवली असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
जिह्यात पहिली ते बारावीपर्यंतचे सुमारे सव्वादोन लाख विद्यार्थी आहेत. ग्रामीण भागात अनेक शाळांची पटसंख्या अत्यंत कमी आहे. त्या गावांमध्ये बाधित सापडण्याचे प्रमाणही कमी आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडून शाळा व्यवस्थापन समित्यांच्या बैठकांमध्ये तेथील शाळा चालू करण्याबाबत चर्चा करून त्या निर्णयाची माहिती घेतली जात आहे. त्यानुसार आतापर्यंत चोविसशेहून अधिक शाळांनी संमती दर्शवलेली आहे.
26 जानेवारीला पालकमंत्री ऍड. अनिल परब यांच्यापुढे ही आकडेवारी सादर केली जाणार आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी पालकमंत्र्यांशी चर्चा करतील व त्यानंतर जिल्हय़ातील शाळा चालू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. जिल्हय़ात 10वी 12वी सह 5 वी ते 8 वीचे शिष्यवृत्तीचे वर्ग जिल्हाधिकाऱयांच्या विशेष परवानगीने सुरू आहेत.
…