कोकण कृषी विद्यापीठाचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. विजय मोरे यांची माहिती
वार्ताहर/ मौजे दापोली
ऑक्टोबर हिटमुळे हैराण झालेल्या रत्नागिरी जिल्हावासियांना थंडीची प्रतीक्षा असतानाच उष्णतेचा प्रकोप 28 ऑक्टोबरपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. विजय मोरे यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना व्यक्त केला आहे.
डॉ. मोरे म्हणाले की, जिल्हय़ात दसऱयापासून तापमान वाढायला सुरूवात झाली आहे. पुढील 15 दिवस उष्णतेचा प्रकोप कायम राहणार आहे. त्यानंतर तापमान उतरत जाईल, असा अंदाज आहे. सध्या अनेक भागात पहाटे धुकं, दिवसभर उन्हाचे चटके व सायंकाळी किंचिंत गारवा असे वातावरण अनुभवायला मिळत असल्याचे ते म्हणाले.
दापोली तालुक्यात 2021 मध्ये 2020 पेक्षा 5 हजार 328.8 मि. मी. अधिक पावसाची नोंद कोकण कृषी विद्यापीठात करण्यात आली आहे. मात्र विक्रमी पाऊस होऊनही शेतीचे फार नुकसान झालेले नाही. परतीच्या पावसाने हळव्या शेतीचे किरकोळ प्रमाणात नुकसान झाल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले.
2020 मध्ये कोरोनाचे संकट आले; शिवाय कोकणातील दापोली, मंडणगड तसेच श्रीवर्धन विभागातील गावांना निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. यात अनेकांनी आपली घरे, बागायती गमावल्या. मात्र वादळाचा प्रभाव सोडता पाऊस सर्वसामान्य म्हणजे 4 हजार 126 झाला, परंतु 2021मध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी तौक्ते चक्रीवादळ आले, परंतु समुद्रालगतच्या गावांचे मोठे नुकसान झाले नाही. विक्रमी पावसाने दापोली शहर व लगतच्या काही गावांमध्ये पाणी साचून, घरांवर झाडे पडून, भिंती व दरड कोसळून नुकसान झाले. कोरोनाचे संकट असतानाच निसर्गाचा प्रकोपही यावर्षी दापोलीकरांना झेलावा लागला.
तर आंबा लवकर मोहरणार
सध्या धुके पडत आहे. ऑक्टोबर हिटला थंडीची जोड मिळाली तर आंब्याच्या जून झालेल्या पालवीला लवकर मोहर येईल. परंतु मध्येच एक दोन दिवस पाऊस पडल्यास नवीन पालवी येईल. त्यामुळे पावसावर बरंच काही अवलंबून आहे. कातळावरच्या बागांना हमखास मोहर येईल. तिथे झाडांनी पालवी टाकायला सुरूवात केली आहे. जोपर्यंत झाडाखालच्या पाण्याचा निचरा होत नाही तोपर्यंत मोहर येण्याची शक्यता कमी आहे. यासाठी आंबा बागांना ऑक्टोबर हिट आवश्यक आहे.
– बी .आर. शाळवी
प्राचार्य, उस्त्रान विभाग,