पॉझिटीव्हीटी रेट 7.95 वर आणखी निर्बंध शिथिल होणार केव्हा
प्रतिनिधी/ सातारा
गेल्या आठवडय़ापासून जिह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 10 च्या आतमध्ये येवू लागला आहे. गावोगावी कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी दक्षता कमिटय़ा आणि ग्रामस्थ काळजी घेवू लागले आहेत. त्यामुळे अनेक गावे आणि शहरे कोरोनामुक्त होताना दिसत आहेत. आणखी निर्बंध कधी शिथिल होणार, जीवनमान पूर्वपदावर येणार केव्हा असा सवाल सर्वसामान्य सातारकरांना पडू लागलेला आहे. काल रात्री 12 वाजेपर्यंत आलेल्या अहवालात 895 जण बाधित आढळून आले तर 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
सातारा जिह्यातील आता परिस्थिती आटोक्यात येवू लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून टप्याटप्याने कोरोना बाधितांचा आकडा हळूहळू कमी येताना दिसत असून गेल्या आठवडय़ापासून पॉझिटीव्हीटी रेटही कमी होवू लागला आहे. शनिवारी सकाळी तो 7.95 वर होता. गेल्या चोवीस तासात आरएटीच्या 7080 तपासण्या झाल्या होत्या. त्यापैकी 396 जण पॉझिटीव्ह आढळून आल्याने 5.59 पॉझिटीव्हीटी होती. तर आरटीपीसीआर टेस्ट 4182 जणांची करण्यात आली त्यापैकी 499 जण पॉझिटीव्ह आल्याने 11.99 इतका पॉझिटीव्हीटी होता. एकूण 11262 जणांचे स्वॅब तपासणी केले गेले त्यातील 895 जणांचे अहवाल हे पॉझिटीव्ह आले त्यामुळे 7.95 इतका पॉझिटीव्हीटी रेट आला आहे. पॉझिटीव्हीटी रेट कमी आल्याने सतेच गावागावात असलेल्या विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेले रुग्ण बरे होवू लागल्याने जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध शिथिल होवू लागली आहेत. मात्र, पूर्णपणे निर्बंध हटवले जावून पूर्वीसारखे जीवनमान कधी होईल याचीच उत्सुकता लागून राहिली आहे.
आतापर्यंत 1 लाख 85 हजार 270 जण बाधित
जिल्हय़ात शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 895 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 16 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर शनिवारअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे. जावली 42 (8309), कराड 231 (25598), खंडाळा 38 (11461), खटाव 46 (18630), कोरेगांव 84 (16129), माण 37 (12654), महाबळेश्वर 3 (4209), पाटण 65 (7964), फलटण 68 (27831), सातारा 226 (38915), वाई 43 (12338) व इतर 12 (1232) असे शनिवारअखेर एकूण 185270 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच शनिवारी मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (185), कराड 6 (748), खंडाळा 1 (147), खटाव 4 (469), कोरेगांव 2 (371), माण 0(249), महाबळेश्वर 0 (44), पाटण 1 (185), फलटण 0 (276), सातारा 2 (1185), वाई 0 (323) व इतर 0, असे आजअखेर जिह्यामध्ये एकूण 4182 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
756 जणांना दिला आज डिस्चार्ज
सातारा जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या शनिवारी संध्याकाळपर्यंत 756 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.