मंगळवारीही 106 नवे कोरोना रूग्ण
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात गणेशोस्तवानंतर कोरोना रूग्णसंख्येत वेगाने वाढ होत असून मंगळवारी सायंकाळी रूग्णसंख्येने 5 हजारांचा टप्पा ओलांडल्याने चिंता वाढली आहे. सलग दुसऱया दिवशीही 106 पॉझीटीव्ह रूग्ण सापडले असून बाधीतांची एकूण संख्या 5 हजार 67 झाली आहे. दरम्यान, रत्नागिरी व संगमेश्वरातील रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोना बाधीत मृतांची संख्या 151 झाली आहे.
रत्नागिरीतील 59 वर्षीय व्यक्तीचा उपचारादम्यान मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बळींची संख्या 45 झाली आहे. तर संगमेश्वरमधील 73 वर्षीय रूग्णालाही जीव गमवावा लागला. हा तालुक्यातील कोरोनाचा 14 वा बळी ठरला आहे.
मंगळवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या 24 तासांत आरटीपीसीआर चाचणीत 22 तर ऍन्टीजेनमध्ये 84 असे 106 नवे रूग्ण सापडले आहेत. आरटीपीसीआर चाचणीमध्ये रत्नागिरीत 19, चिपळूण 2 व मंडणगडात एक पॉझीटीव्ह रूग्ण आढळला आहे. ऍन्टीजेन चाचणीत चिपळूण व गुहागरमध्ये प्रत्येकी 13, खेडमध्ये 20, राजापुर 1 तर रत्नागिरीत सर्वाधिक 37 रूग्ण सापडले आहेत. दापोली, संगमेश्वर व लांजा तालुक्यात एकही नवा रूग्ण आढळलेला नाही.
आणखी 66 जण बरे
कोरोनावरील उपचारानंतर आणखी 66 जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये पेढांबे येथून 29, सामाजिक न्यायभवन 16, कळंबणी 9, पाचल 5, गुहागर 4, मंडणगड 2 व घरडामधील एकाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 3126 झाली आहे.