पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोविडच्या नियमात मोठी शिथिलता आणण्यात आली असून आता जिल्हय़ाबाहेरून येणाऱयांना होम क्वारंटाईन ठेवण्याचे बंद करण्यात आले आहे, अशी माहिती देतानाच जिल्हय़ात आता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत आहे. मात्र, मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्यात येणार, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हय़ाबाहेरून जिल्हय़ात येणाऱयांना 14 दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा नियम अजूनही लागू आहे की नाही, याबाबत पालकमंत्री सामंत यांना विचारले असता जिल्हय़ाबाहेरून आलेल्यांना आता क्वारंटाईनचा नियम शिथिल करण्यात आला आहे. मात्र, जे लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत व होम आयसोलेशनमध्ये आहेत, त्यांना 14 दिवस क्वारंटाईन राहवेच लागणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
97.15 टक्के लोकांचे सर्वेक्षण
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत सात लाख 83 हजार 592 लोकांपैकी सात लाख 61 हजार 254 लोकांचे सर्वेक्षण झाले असून 97.15 टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या सर्व्हेमध्ये 122 रुग्ण सारी या आजाराचे सापडले आहेत. 390 रुग्ण मलेरिया, डेंग्यू व इतर आजाराचे सापडले आहेत. कोरोना 1158 संशयित आढळले. त्यातील 747 लोकांची तपासणी केली असता 299 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती दिली.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात आता कोरोना रुग्ण कमी होत आहेत, ही समाधानाची बाब आहे. मात्र, आतापर्यंत 114 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 2.5 टक्के मृत्यू दर असून तो अजून कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेत सुधारणा करणार, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते आणि जान्हवी सावंत उपस्थित होते.
कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी अपर जिल्हाधिकाऱयांनी केलेली चौकशी अजिबात मान्य नाही. त्यामुळे कोकण विभागीय आयुक्त व शासनामार्फत चौकशी सुरू आहे. या प्रकरणात कुणालाही पाठिशी घालणार नाही. कारवाई होणारच, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. शिक्षण खात्याशी संबंधित जिल्हय़ात अनेक प्रश्न असल्याने लवकरच माध्यमिक शिक्षण विभागाचा जनता दरबार घेणार, असे जाहीर करण्यात आले.