लसीकरण मोहीम पुन्हा गतीमान होणार
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हय़ात कोरोना लसीच्या तुठवडय़ामुळे आरोग्य विभागासमोर मोठा पेच उभा राहिला होता. जिल्ह्य़ात कोरोना लसीकरण मोहिमेसही मर्यादा आल्या होत्या. मात्र सोमवारी जिह्याला 19 हजार 200 कोविशिल्ड लसीचे डोस प्राप्त झाल्याने आरोग्य विभागाने सुस्कारा टाकला आहे.
कोरोनावरील लसीच्या तुटवडय़ाचा फटका रत्नागिरी जिह्याला बसला. लसीकरणासाठी कार्यरत जिल्ह्य़ातील 91 केंद्रांपैकी केवळ 3 केंद्रांवरच लसीकरण सुरु ठेवण्याची वेळ येऊन ठेपली होती. 10 एप्रिलपर्यंत जिल्ह्य़ासाठी केवळ 800 डोस शिल्लक होते. जिल्ह्य़ासाठी 1 लाख 70 हजार लस आवश्यक धरून त्याची मागणी जिल्हा आरोग्य विभामार्फत करण्यात आली आहे.
सध्या जिह्यात दिवसाला 200 हुन अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे लसीचा तुटवडा जाणवू नये यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्याला प्रत्येकी 10 हजार डोस मिळावेत म्हणून आरोग्य संचालक अर्चना पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार सोमवारी सकाळी रत्नागिरी जिह्यासाठी 19 हजार 200 कोविड शिल्डचे डोस घेऊन जिल्हा आरोग्यविभागाची वातानुकूलीत व्हॅन कोल्हापूरहून रवाना झाली आहे.
-लसीकरण मोहीम पुन्हा गतीमान होणार
रत्नागिरी जिल्हात 16 एप्रिल 2021 पासून पुन्हा लसिकरणाला वेग येणार असून जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्रा.आ.केंद्र स्तरावर केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सुचनाप्रमाणे 45 वर्षा वरील पात्र लाभर्थ्यांना कोव्हिड लस दिली जाणार असल्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी सांगितले आहे. जिल्हात एकूण 62 प्रा.आ.केंद्र, 7 ग्रामीण रुग्णालय, 3 उप जिल्हा रुग्णालय, 1 जिल्हा रुग्णालय तसेच 3 शहरी प्रा.आ.केंद्र व 7 खाजगी रुग्णालये असे एकूण 112 केंद्रावर लसिकरण मोहिम राबवण्यात आली आहे. ज्यांचे दुसरा डोस शिल्लक आहे त्यांनी योग्य कालावधीनंतर तो घेऊन पूर्ण लसिकरण करुण घ्यावे व करोना पासून संरक्षण मिळवावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी केले आहे