बाजारपेठेतील गर्दीमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची भीती : जनतेने सावधानता बाळगणे आवश्यक
प्रतिनिधी/ बेळगाव
सोमवारपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली गेली आहे. त्यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी उसळत आहे. यामुळे पुन्हा कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, मंगळवार दि. 5 रोजी एकही कोरोनाग्रस्त रुग्ण जिल्हय़ात आढळला नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
आतापर्यंत जिल्हय़ामध्ये 73 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामधील 26 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सोमवारी तब्बल 11 जण बरे झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने काहीशी भीती कमी झाली आहे. असे असले तरी जनतेने सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता जाहीर करताच शहरामध्ये गर्दी उसळत आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका अधिक निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यासाठी प्रत्येकाने सोशल डिस्टन्स राखणे महत्त्वाचे आहे. नियमांचे पालन करतच आपले व्यवहार करणे हितकारक ठरणार आहे. अन्यथा, मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काही जणांच्या अहवालाची प्रतीक्षा
मंगळवारी आलेल्या अहवालामध्ये एकही रुग्ण आढळला नाही, ही बाब महत्त्वाची आहे. मात्र, अजूनही काही जणांचे अहवाल यायचे बाकी आहेत. येळ्ळूर, बेळगुंदी, कॅम्प येथील कोरोनाग्रस्त रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. यामुळे काही प्रमाणात या परिसरातील जनतेच्या मनातील भीती कमी झाली आहे.
नियमांचे पालन करणे हितकारक
लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे शहरामध्ये गर्दी उसळत आहे. सोशल डिस्टन्स राखण्याकडे कुणाचेच लक्ष नाही. त्यामुळे पुन्हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा प्रशासनाने जरी मुभा दिली तरी प्रत्येकानेच स्वतःहून नियमांचे पालन करणे हितकारक ठरणार आहे. सध्या कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होत आहेत. याचबरोबर त्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे जिल्हय़ाला दिलासा मिळत आहे. मात्र, याचा गैरफायदा घेणे धोक्याचे ठरणार आहे.