प्रतिनिधी/ सातारा
कडक उन्हाळा आणि कोरोनाची भीती त्यातच मंगळवारपासून निसर्ग वादळ व पावसाची दहशत सातारा जिल्हय़ाने अनुभवली. विशेषतः पश्चिम भागातील सातारा, वाई, जावली, महाबळेश्वर, पाटण व कराड परिसरात बुधवारी 50 ते 60 कि. मी. वेगाने वाहणारे सोसाटय़ाचे वारे आणि कोसळणाऱया जलधारांनी दुपारपर्यंत चांगलेच थैमान घातले. महापूर व पावसाचा अनुभव जिल्हावासियांना असला तरी वादळी वाऱयासह पावसाने जिल्हय़ातील जनजीवन बुधवारी सकाळपासून विस्कळीत करुन टाकले होते. निसर्ग वादळाचा तडाखा जिल्हय़ाने अनुभवला मात्र अगोदरच सुचना असल्याने नागरिकांनी देखील घरातच बसणे पसंद केले होते.
हवामान विभागाच्या सूचनेनुसार महाराष्ट्रात कोकण विभागात अरबी समुद्र किनाऱयावर 1 जून ते 4 जून कालावधीत निसर्ग चक्रीवादळ धडकणार असल्याबाबत हवामान खात्याने इशारा दिला होता. जिल्हय़ात त्याची सुरुवातही झाली होती. मात्र बुधवारी पहाटेपासूनच निसर्ग वादळाचे रौद्र रुप जिल्हय़ातील लोकांनी अनुभवले. या वादळाचा परिणाम सातारा जिह्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नुकसान होण्याची शक्यता गृहीत धरुन सर्व विभागांनी सतर्क राहून आपल्या विभागाशी सर्व त्या उपाययोजना राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले होते.
बुधवारी पहाटेपासूनच वादळाची तीव्रता जाणवायला सुरवात झाली होती. त्यामुळे झाडांमधून सोसाटय़ाच्या वाऱयाचा आवाज ऐकायला मिळत होता. त्यातच कोसळणारा मुसळधार पाऊस अंगावर काटा आणत होता. यामध्ये महाबळेश्वर परिसरात महावितरणने काल रात्रीपासून अनुचित प्रकार टाळण्यासाठी वीज पुरवठा खंडीत केला होता. प्रचंड पाऊस, सोसाटय़ाचा वाऱयाने महाबळेश्वरमध्ये नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत तर सातारा शहरात देखील अनेक ठिकाणी मोठे फलक तर पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या आहेत. यादरम्यान जिल्हय़ात पोलीस दलासह प्रशासनही अर्लट होते. दरम्यान, जावली तालुक्यात काटवली येथे 3 व महिगाव येथे 1 अशा 4 घरांची पडझड होवून सुमारे 1 लाख 15 हजारांचे नुकसान झाले आहे.
आपतकालीन विभाग होता सज्ज
संभाव्य ‘निसर्ग’ या वादळाचा परिणाम सातारा जिह्यातही होणार असल्याने यामुळे संभाव्य अतिवृष्टी, वादळ-वारे होऊन झाडांची मोठय़ा प्रमाणात पडझड होणे, विद्यूत खांब, तारांचे नुकसान होणे, वीज पुरवठा खंडीत होणे, संपर्क यंत्रणा खंडीत होणे, वाऱयांमुळे घर पडझड किंवा इतर बाबींचे नुकसान होण्याची शक्यता गृहीत धरुन सर्व विभागांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले होते. मात्र जिल्हय़ात सुदैवाने फारसे नुकसान वा केठेही जीवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. जिल्हय़ात बुधवार, दि. 3 रोजी मि.मी. मध्ये पडलेला पाऊस महाबळेश्वर 41.0, पाचगणी 12.3, तापोळा 18.6, लमाज 32.4, एकूण 104.3 व सरासरी 26.0 असा होता.