प्रतिनिधी / मालवण:
अतिवृष्टीमुळे जिल्हय़ात 23 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. या भरपाईसाठी पहिल्या टप्प्यातील साडेपाच कोटी रुपये जिल्हय़ाला प्राप्त झाल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी सांगितले. मालवण तालुक्यातील तळगाव तलाठी सजाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अमोल पाठक, निवासी तहसीलदार आनंद मालवणकर, सरपंच अनघा वेंगुर्लेकर, उपसरपंच अनंत चव्हाण, जि. प. सदस्य नागेंद्र परब, संग्राम प्रभूगावकर, संजय पडते, मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी आदींसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
झाराप येथे मेडिकल कॉलेजसाठी जागा
झाराप येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी शिक्षण विभागाची जागा देण्यास 48 तासांत मान्यता दिल्याचे सांगून पालकमंत्री सामंत म्हणाले, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करता यावे, यासाठी जिल्हय़ात जानेवारी महिन्यात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सर्वांशी संवाद साधता यावा व नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावता यावेत, यासाठी जनता दरबार सुरू करण्यात आला आहे. हे जनता दरबार तालुकास्तरावर घेण्यात येणार आहेत. तळगाव ग्रामपंचायतीच्या इमारतीचे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल. या तलाठी सजाचे उद्घाटन करताना मला मनापासून आनंद होत आहे. दर सोमवारी आणि गुरुवारी तलाठी या कार्यालयात थांबून लोकांची कामे करतील. तलाठय़ांनी लोकांचा विश्वास संपादन करून चांगले काम करावे, असेही पालकमंत्री म्हणाले.
खासदार, आमदारांचे कौतुक
आदर्श खासदार कसे असावेत हे पाहण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात यावे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, या जिल्हय़ाला बॅरिस्टर नाथ पै, प्रा. मधु दंडवते यांचा वारसा लाभला आहे. त्याचे जतन खासदार राऊत करत आहेत. आमदार नाईक यांचे कामही आदर्श आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघात सर्वात जास्त तलाठी सजा आहेत, या मतदारसंघात सर्वात जास्त निधी आणण्याचे कामही आमदार नाईक यांनी केले आहे. तळगावच्या सरपंच अनघा वेंगुर्लेकर यांनी स्वागत केले. खासदार राऊत, आमदार नाईक यांनीही मार्गदर्शन केले. tion