नागरिकांचा ठिय्या, प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिवबनाना जाधव पार्क परिसरसह इंगवले कॉलनी, मुक्ताईनगर, तसेच कळंबा रिंग रोड मुख्य रस्त्या सह आदी भागातील रस्ते गटार व ड्रेनेजसह पाण्याच्या पाईपलाईनचे अर्धवट असलेली कामे करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव यांच्यासह भागातील नागरीक आमरण उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत अर्धवट असलेली कामे पूर्ण होत नाहीत तो पर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार येथील नागरिकांनी केला आहे.
प्रभागामध्ये हॉटेल फूड अर्बन पासून जिवबा नाना जाधव पार्कला जाणारा रस्ता तसेच पोदार हायस्कूल पासून कळंब्याला जोडणारा रस्ता गेली अनेक वर्षापासून खड्डेमय व नागरिकांसाठी जीवघेणा बनला आहे. त्याचबरोबर जयसिंगराव इंगवले कॉलनीमध्ये अमृत योजनेचे अर्धवट लाईन टाकली आहे. सर्व पाईप मेन रोडला असल्या कारणाने वारंवार तुटली जाते व पाण्याची गळती होवून लोकांना पाणी पुरवठा होत नाही. अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांना य वारंवार सूचना देवून व प्रत्यक्षात दाखवून देखील कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही.
मुक्ताईनगर येथे २७ ते २८ प्लॉटधारक राहतात त्या लोकांना पाण्याचे कनेक्शन महापालिकेच्यावतीने देण्यात यावे. येथील अमृत योजनेअंतर्गत सर्व रस्ते उकरले गेलेले आहेत. त्याच पॅचवर्क ताबडतोब करून मिळावे. तसेच जिवबानाना जाधव पार्कला जाणारा मुख्य रोड व कळंब्याला जोडणारा मुख्य रोड हा लोकांच्यासाठी वाहतुकीला मृत्यूला आमंत्रण देणारा बनत आहे. या दोन्ही रोडवरून आजूबाजूच्या अनेक कॉलन्यांची ये-जा असल्या कारणाने लोकांच्यासाठी जीवघेणा ठरत आहे. हे दोन्ही रोड डांबरीकरण करून मिळण्याबाबत भागातील सर्व नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून पासून महानगरपालिकेला निवेदनाव्दारे, आंदोलनाव्दारे मागणी केली. पण प्रत्येकवेळी निवेदनांना व मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे. भागातील सर्व रखडलेली कामे प्रशासनाकडून त्वरित करावी यासाठी येथील नागरिक आमरण उपोषणास बसले आहेत. या आंदोलनात राजू जाधव यांच्यासह परिसरातील नागरीकांनी यात सहभाग घेतला.