प्रत्यक्ष कामास सुरुवात केल्याने उपोषण मागे, नागरिकांच्यातून समाधान व्यक्त, रखडलेल्या कामांचा प्रश्न मार्गी
कोल्हापू/प्रतिनिधी
राधानागरिरोड या मुख्य मार्गापासून जिवबनाना जाधव पार्क परिसरसह इंगवले कॉलनी, मुक्ताईनगर, तसेच कळंबा रिंग रोडला जोडणाऱ्या मुख्य रस्त्या सह भागातील रस्ते गटार व ड्रेनेजसह पाण्याच्या पाईपलाईनची रखडलेली कामे करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव यांच्यासह भागातील नागरीक सोमवारपासून आमरण उपोषणास बसले होते.
उपोषण सुरू झाल्यापासून मनपा अधिकारी, जलाभियंता यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला यश आले नाही. जोपर्यंत रखडलेल्या कामाला प्रत्यक्ष कामास सुरुवात होत नाही तो पर्यंत उपोषण मागे घेणार नाही यावर नागरिक ठाम होते. दरम्यान बुधवारी सायंकाळी नेत्रदीप सरनोबत, एन. एस. पाटील, अजय पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. पण तरीही आश्वासन नको प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा या मागणीवर नागरिक ठाम होते. गुरुवारी सकाळी चौथ्या दिवशी उपोषणकर्त्यांची तब्येत फारच बिघडली. भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, अजित ठाणेकर यांनी प्रशासनाशी चर्चा केली. यावेळी मनपा अधिकारी आंदोलनस्थळी येऊन रखडलेल्या कामांची पाहणी करून प्रत्यक्ष कामास सुरुवात केली.
यानंतर राजू जाधव व नागरिकांनी उपोषण मागे घेतले. यावेळी पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर, महानगरपालिकेचे नेञदिप सरनोबत, शाखा अभियंता जिल्हापरिषद विजय पाटील, एन.एस. पाटील, जलअभियंता अजय साळोखे, रावसाहेब चव्हाण यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले.
प्रभागामध्ये हॉटेल फूड अर्बन पासून जिवबा नाना जाधव पार्कला जाणारा रस्ता तसेच पोदार हायस्कूल पासून कळंब्याला जोडणारा रस्ता गेली अनेक वर्षापासून खड्डेमय व नागरिकांसाठी जीवघेणा बनला आहे. त्याचबरोबर जयसिंगराव इंगवले कॉलनीमध्ये अमृत योजनेअंतर्गत अर्धवट पाण्याची लाईन टाकली आहे. सर्व पाईप मेन रोडला असल्या कारणाने वारंवार तुटली जाते व पाण्याची गळती होवून लोकांना पाणी पुरवठा होत नाही. मनपा प्रशासनास वारंवार निवेदने देवून व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष रखडलेली कामे दाखवून सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही. मुक्ताईनगर येथे २७ ते २८ प्लॉटधारक राहतात त्या लोकांना पाण्याचे कनेक्शन महापालिकेच्या वतीने देण्यात यावे. येथील अमृत योजनेअंतर्गत सर्व रस्ते उकरले गेलेले आहेत. त्याचे पँचवर्क करून मिळावे. तसेच जिवबानाना जाधव पार्कला जाणारा मुख्य रोड व कळंब्याला जोडणारा मुख्य रोड हा लोकांच्यासाठी वाहतुकीला धोक्याचा व मृत्यूला आमंत्रण देणारा ठरत आहे. याचे डांबरीकरण व्हावे. या सर्व मागण्यासाठी गेले चार दिवस हे उपोषण सुरू होते.
गेले काही दिवस रखडलेल्या कामाला मनपा प्रशासनाकडून प्रत्यक्षात सुरुवात झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. . या आंदोलनात सचिन जाधव, रिंकू देसाई,सुनील वाडकर, सुनील साळोखे, रवि पाटील, विजयसिंह देसाई तसेच भागातील महिला व नागरिकांनी पाठिंबा दिला.