वार्ताहर/ टाळसुरे
दापोली तालुक्यातील आडे येथील आंबा व्यावसायिक अरुण लिमये यांनी जिह्यातील पहिली हापूस आंबा पेटी मुंबई वाशी मार्केटला पाठवण्याचा मान पटकावला आहे. वाशी मार्केटला आबाजी रामजी ऍन्ड कंपनी यांना ही हापूस पेटी विक्रीसाठी पाठवण्यात आली आहे.
आबाजी रामजी ऍन्ड कंपनी यांनी प्रतिक्रिया देताना सध्या वाशी मार्केटला हापूस आला नाही. त्यामुळे आंबा पेटीला सध्या चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अरुण लिमये यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या व्यवसायाला बसत आहे. नैसर्गिक खतांचा वापर केला, योग्य नीगा राखली तर चांगले पीक येत असून आता माल तयार होत आहे. कौस्तुभ लिमये यांनी सांगितले की, सप्टेंबर अखेरीस मोहोर आला होता. त्यामुळे फळधारणा चांगली झाली. बदलत्या हवामानामुळे बुरशीनाशक आणि किटकनाशक यांची फवारणी करावी लागली आहे. साधारणपणे 8 ते 10 हजार रूपये पर्यंत 4 डझन पेटीचा दर मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. ही पेटी दापोलीतील कामगार मोटार ट्रान्सपोर्ट वाहतूक व्यावसायिक कंपनीमधून वाशी मार्केटला रवाना झाली. जिह्यातील ही पहिलीच पेटी असल्याचे व्यवस्थापक उमेश चोगले यांनी सांगितले.