प्रतिनिधी/ रत्नागिरी
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हय़ातील सर्व 479 ग्रामपंचायतीमधील अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची संख्या रात्री उशीरापर्यंत स्पष्ट झाली नव्हती. मात्र जिल्हय़ात सुमारे 20 टक्के ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर रत्नागिरीतील आकडेवारी सायंकाळी उशिरा प्राप्त झाली असली तरी सगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर तालक्यातील चित्र रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.
चिपळूण तालुक्यात 19, गुहागरात 13, खेडमध्ये 5, मंडगडात 2 तर दापोलीमध्ये 13 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याची माहिती त्या त्या तहसील कार्यालयातून देण्यात आली. गावपॅनेलमधील रस्सीखेच, बेरकी राजकारण यामुळे अनेक उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या विहीत मुदतीत तहसील कार्यालयात दाखल न झाल्याने पुढच्या सर्व प्रक्रियेला विलंब झाला. त्यात जिल्हय़ातील वैध उमेदवार अर्जांची संख्या 7 हजाराहून अधिक असल्याने रात्री उशिरापर्यंत सर्व तालुक्यात लगबग सुरू होती. रत्नागिरीसह दक्षिणेतील 4 तालुक्यातील अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची संख्या रात्रीr उशीरापर्यंत कळू शकली नाही.
सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. यासाठी दुपारी 3 ची वेळ देण्यात आली होती. अनेक उमेदवार या वेळेत दाखल झाले. यात गावपॅनेलच्या अनेक उमेदवारांनी अखेरच्या क्षणी माघार घेतल्याचे चित्र दिसत होते. दरम्यान, अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने त्या त्या तालुक्यातील अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नेमकी संख्या स्पष्ट होत नव्हती.