सागर पाखरे/ पाली
रत्नागिरी जिह्यातील 1000 सेंद्रीय शेती उत्पादक शेतकऱयांना इतिहासात पहिल्यांदाच आता अधिकृतपणे शेतीमालाच्या विक्रीसाठी जागतिक बाजारपेठेचे दरवाजे खुले झालेले आहेत. त्यामुळे शाश्वत आवश्यक तृतीय पक्ष प्रमाणीकरण प्रणालीचे सातत्याने मागील 4 वर्षे शेते संस्थाकडून परीक्षण होऊन रत्नागिरी जिह्यातील 9 तालुक्यांमधील 41 गावातील 1000 शेतकऱयांना लवकरच प्रमाणपत्र वितरीत केले जाणार आहे. बेंगलोरच्या आदिती संस्थेकडून गेली 4 वर्षे प्रमाणीकरणाच्या परीक्षणाची प्रक्रिया रत्नागिरी जिह्यामध्ये सुरु होती. सेंद्रीय शेती उत्पादक शेतकऱयांना सर्व मार्गदर्शन व प्रमाणीकरणासाठीचा खर्च शेतकऱयांच्यावतीने समृद्धी ऑर्गनिक फार्म इंडिया प्रा.लि. पुणे यांनी केल्याने शेतकऱयांना ही प्रक्रिया विनामुल्य प्राप्त झाली आहे. यामुळे जिह्यातील सेंद्रीय शेती उत्पादक शेतकऱयांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.
या प्रक्रियेबाबत माहिती देताना समृद्धी ऑरगॅनिकचे शेतीतज्ञ संदीप कांबळे यांनी सांगितले की, ही तृतीय पक्ष प्रमाणीकरण प्रक्रिया भारतामध्ये अपेडा अंतर्गत 29 नोंदणीकृत संस्थामार्फत केली जाते. त्यातील बेंगलोरच्या प्रसिद्ध आदिती या संस्थेमार्फत गेली चार वर्षे सातत्याने जिह्यातील सेंद्रीय शेती उत्पादक शेतकऱयांचे निकषांप्रमाणे परीक्षण करुन ही सर्व प्रक्रिया पुर्णत्वास गेली आहे. यामध्ये सेंद्रीय शेती करणाऱया शेतकऱयांचे शेतीची पद्धत वापरत असलेले बि-बियाणे, तांत्रिक सल्ला, खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे सविस्तर परीक्षण, यांसारख्या घटकांचे बारकाईने निरीक्षण व कठोर पडताळणी करण्यात आली व ही प्रक्रिया सातत्याने तीन वर्षे सेंद्रीय शेतकऱयांच्या बांधावर जाऊन करण्यात आली त्यानंतरच ही सर्व प्रक्रिया पुर्णत्वास जाऊन शेतकऱयांना जागतिक बाजारपेठेची दरवाजे खुली झाली आहेत. या प्रक्रियेसाठी प्रत्येक शेतकऱयाला क्षेत्रनिहाय 25 ते 30 हजारांचा खर्च येणार होता परंतु तो खर्च समृद्धी ऑर्गनिक फार्म इंडिया प्रा. लि. पुणे यांनी स्वतः उचलून शेतकऱयांना या प्रक्रियेचा विनामुल्य लाभ दिला आहे असे त्यांनी सांगितले.
यासर्व प्रक्रियेसाठी जिह्यातील गावे पुर्णपणे सेंद्रीय शेती करण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजना 20162017 अंतर्गत जिह्यात 28 सेंद्रीय शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली होती. त्याद्वारे या शेतकरी उत्पादीत सेंद्रीय शेती मालाच्या देशांतर्गत विक्रीसाठीची सहभागिता हमी प्रमाणीकरण प्रणाली प्रक्रिया ही कृषी विभाग आत्माने करुन शेतकऱयांना प्रमाणपत्र दिलेले आहे. त्याद्वारे देशातर्गंत शेतमाल विक्रीसाठी शेतकऱयांना चांगला फायदा होत आहे. तसेच तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी, रत्नागिरी आरिफ शाहा यांनी रत्नागिरीतील सेंद्रीय ग्राम चळवळीसाठी विशेष लक्ष देऊन सहकार्य केले होते. म्हणून ही प्रक्रिया राबवताना उपयोग झाला. शिवाय समृद्धीने ही सेंद्रीय शेतीची चळवळ जिह्यातील सर्व तालुक्यांतील विशेषतः दुर्गम गावांमध्ये प्राधान्याने राबवून जेणेकरुन तेथील शेतकऱयाला सेंद्रीय शेतीद्वारे शाश्वत उत्पन्नातून आर्थिक सक्षम व स्वावलंबी करण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरुन समतोल विकास साधत सेंद्रीय शेतीची योजना राबवली जात आहे.
रत्नागिरी जिह्यामध्ये सेंद्रीय शेतकरी गटाच्या माध्यमातून सामुहिक शेती करण्याचे फायदे शेतकऱयांना सर्वाधिक झालेले आहेत. कारण आपल्याकडे शेतकऱयांची तुकडय़ांमध्ये विभागलेली शेतीची क्षेत्र असल्याने प्रमाणीकरण परीक्षणाला मोठी अडचण येते. त्याऊलट जर सामुहिकपणे सेंद्रीय शेती तंत्रज्ञान वापरुन पारंपारीक बि-बियाणे लागवड पद्धतीचा अवलंब करुन शेती केल्यास रासायनिक घटकांचे अंश जाण्याचे प्रमाणही अत्यल्प राहते. शेतीचे पीक निरोगी येते. तसेच भाजावळी मुक्तीचा प्रयत्न होणेही आवश्यक आहे. त्यासाठी शेतातील सर्व कचरा एकत्रित करुन त्यावर ट्रायकोडर्मा, वेस्ट डी कंपोझर्स यांचे मिश्रण करुन त्यावर टाकल्यास चांगले कंपोस्ट खत तयार होते. तसेच रासायनिक औषधांऐवजी निसर्गातल्या 10 वनस्पतींच्या पानांच्या अर्कांला एक ते दीड महिना कुजवून त्यापासून दशपर्णी अर्क तयार करता येतो. त्यातील उग्र, तुरट, तिखट, आंबटपणामुळे किडे, अळी यांवर नियंत्रण मिळवता येते. तसेच अगदी घरातील आले, मिरची, लसूण यांच्याही अर्काची फवारणी उत्तम परिणामकारक ठरते. तसेच देशी गाईचे गोमुत्र 5टक्के प्रमाणात फवारणी केल्यास नत्रासाठी व जंतुनाशक म्हणूनही प्रभावी ठरते. शेणाचे गांडूळखत अत्यल्प खर्चात तयार होते त्याच्या वापराने खते, औषधे यांची बचत होऊन झाडांची निकोप वाढ होऊन जमिनेचे आरोग्य सुधारते.
रत्नागिरी जिह्यातील राजापूर तालुका परुळे,मोसम, उपळे इ. 100 शेतकरी, लांजा तालुका कोलधे, गवाणे, बापेरे, माजळ, रावारी, खावडी 150 शेतकरी रत्नागिरी तालुका खानू, वळके, पाथरट, केळये, मजगाव, पावस, पुर्णगड, निरुळ, वाटद, खंडाळा, नांदीवडे, मावळंगे, कोळीसरे 260, शेतकरी, संगमेश्वर तालुका साखरपा, देवळे तर्फे पुर्ये, किरबेट, देवढे, भोवडे, कासार कोळवण, निवे खु. ऱ 150 शेतकरी, चिपळूण तालुका भिले, धामेली, धामणवणे ऱ 75 शेतकरी, खेड तालुका आयनी, वाडीमालदे 60 शेतकरी, दापोली तालुका दाभोळ, वेळवी 70 शेतकरी, गुहागर तालुका कौंढरकासुर, कुटगिरी ऱ 75 शेतकरी मंडणगड तालुका तुळशी, पाले, आंबडवे 60 शेतकरी या सेंद्रीय शेतकरी गटातील शेतकऱयांना 2016-17, 2017-2018, 2018-2019, 2019-2020 या वर्षामध्ये परीक्षण होऊन तृतीय पक्ष प्रमाणीकरणाचा लाभ मिळणार आहे. शिवाय समृद्धी ऑर्गनिक फार्म प्रा.लि. पुणे यांच्यामार्फत उत्पादीत सेंद्रीय शेतीमालाची खरेदी व विपणन प्रक्रिया ही सुरु करण्यात आली आहे. प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया ही लवकरच सुरु होत आहे.
फोटो ओळी – वाटद समृद्धी मार्फत तृतीय पक्ष प्रमाणीकरण प्रणालीचे परीक्षण करताना शेतीतज्ञ संदीप कांबळे व इतर.
प्रमाणपत्र धारक शेतकरी प्रतिक्रिया 1.राकेश रकटे तुळशी पाले ता. मंडणगड. आमच्या दुर्गम तालुक्यातही सेंद्रीय शेतीची चळवळ यशस्वीरित्या पोहचून त्यातून आम्हांला स्वावलंबी होता येत आहे. याचा अभिमान आहे शिवाय आता यातून जागतिक बाजारपेठेसाठी सज्ज होण्याची तयारी सुरु आहे.