प्रत्येक गावांना लाखो रुपयांची बिले, ग्रामविकास अधिकाऱयांपुढे पेच
प्रतिनिधी/ सातारा
पूर्वी गावातील स्ट्रीट लाईटचे बील हे राज्यशासन भरत होते. परंतु अलिकडच्या काळात महावितरणकडून मागच्या पाच सहा वर्षाची थकबाकी दाखवत लाखो रुपयांची बिले ग्रामपंचायतींना पाठवली. मागच्या सहा महिन्यापूर्वी आंदोलन झाले होते. तेव्हा स्ट्रीट लाईट सुरु करण्यात आल्या होत्या. परंतु पुन्हा गेल्या पंधरा दिवसांपासून जिह्यातील 1495 गावे पुन्हा स्ट्रीट लाईटच्या बिलाच्या कारणास्तव अंधारात चाचपडत आहेत. त्या गावच्या ग्रामसेवकांपुढे प्रश्न आहे ही लाखो रुपयांची बिले भरायची कशातून?, लाईट नसल्यामुळे रात्रीच्या चोऱया वाढल्या आहेत. या दिवसात सर्पदंश होण्याचीही शक्यता आहे.
सातारा जिह्यातील सर्वच 1495 गावातल्या स्ट्रीट लाईट गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहेत. यापूर्वी गत वर्षात हा प्रश्न निर्माण झाला होता. कित्येक दिवस स्ट्रीट लाईट बंदच होत्या. सरपंच परिषदेने आंदोलनाचे हत्यार उपसले होते. सरपंच परिषदेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली साताऱयात कंदिल मोर्चा काढण्यात आला होता. राज्य शासन पातळीवर यावर तात्पुरता तोडगा काढण्यात आला होता. तेव्हा स्ट्रीट लाईट सुरु करण्यात आली होती. स्ट्रीट लाईट त्यावेळी सुरु झालेली होती. परंतु सहा महिन्यानंतर पुन्हा पंधरा दिवसांपासून स्ट्रीट लाईट बंद पडली असून प्रत्येक गावांना मागच्या थकबाकीसह चालू महिन्यांची बिले पाठवत त्यांच्या स्ट्रीट लाईट बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वच गावे अंधारात आहेत. सध्या सुगीचे दिवस आहेत. या दिवसात ग्रामीण भागात पेरणीची लगबग असते. पेरणीच्या काळात संध्याकाळी गावागावात स्ट्रीट लाईट गरजेची असते. वातावरणामुळे सर्पही निघतात. सर्पदंश होण्याची शक्यता असते. तसेच स्ट्रीट लाईट नसल्याने चोरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, महावितरण कार्यालयाकडून दिलेली बिले कधी भरणार यावर तोडगा काय निघणार हे सर्व अनुत्तरीत आहे. त्यामुळे ग्रामसेवकांसह सर्वच गावचे सरपंच सध्या संभ्रमात असून स्ट्रीट लाईट बिल भरले नसल्याने गावोगावी अंधार आहे.
हा प्रश्न आमच्या अखत्यारित आता राहिलेला नाही
गावोगावीच्या स्ट्रीट लाईटचा प्रश्न आता आमच्या अखत्यारित राहिलेला नाही. ग्रामविकास विभागाकडून हे लाईट बिल भरण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींना त्याकरता शासन पातळीवरच पैसे येतील असे समजते.