समाजकल्याण सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांचे आदेश, अनुदानित, विनाअनुदानित अशा जवळपास 420 महाविद्यालयांना सूचना
कोल्हापूर / प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या काळात अनेककांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे अकरावी ते उच्च शिक्षणापर्यंतच्या मागासवर्गीय शिष्यवृत्तीधारकांकडून प्रवेश शुल्क आकारल्यास संबंधीत महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशा सूचना समाजकल्याण सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी पत्रकाव्दारे दिल्या आहेत. त्यामुळे जिह्यातील जवळपास 220 व्यावसायिक व 200 विना व्यावसायिक महाविद्यालयांमधील 34 हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्कही आकारले जात असल्याच्या तक्रारी समाजकल्याण खात्याकडे आल्यामुळे खात्याने कारवाईचा निर्णय घेतला आहे. यापुर्वी काही महाविद्यालयांवर कारवाई करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली आहे. यंदाही इचलकरंजी येथील एका महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दिलेली नाही, अशी तक्रार विद्यार्थी संघटनेच्यावतीने सामाजिक न्याय मंत्र्यांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेश शुल्क आकारल्यास फौजदारी करण्याचा निर्णय समाजकल्याण विभागाकडून घेण्यात आला आहे. तसेच संबंधीत महाविद्यालयावर कारवाई करून आठ दिवसाच्या आत पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हय़ातील महाडिबीटी या संकेतस्थळावर शासनमान्य अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयांचे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सुरू आहेत. अशा महाविद्यालयांनी सामाजिक न्याय विभागाच्या शासन निर्देशाचे पालन करणे बंधनकारक आहे. या निर्देशानुसार शासकीय व मान्यताप्रप्त विद्यापीठ संलग्न अनुदानित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क मिळवून देण्याची जबाबदारी संबंधित प्राचार्यांची असते. शिष्यवृत्तीमध्ये विलंब, गैरप्रकार अथवा काही अपहार झाल्यास संबंधित शैक्षणिक संस्थेविरुद्ध दंडनीय कार्यवाही केली जाते. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करून संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई समाजकल्याण विभाग करते. या प्रकरणी सकृतदर्शनी प्राचार्य जबाबदार असल्यास समाजकल्याण अधिकारी संबंधीत प्राचार्यांवर गुन्हा दाखल करतात.
शिष्यवृत्तीधारकांना न्याय देणार
समाज कल्याण खात्याकडे गतवर्षी जेवढे अर्ज आले होते, त्या सर्व विद्यार्थ्यांना शासनाने शिष्यवृत्ती दिलेली आहे. समाजकल्याण खात्याने दिलेल्या विहीत वेळेत अर्ज भरून शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा. महाविद्यालयाकडून शिष्यवृत्ती न मिळाल्यास समाजकल्याण विभागाकडे विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा, शिष्यवृत्तीधारकांना न्याय दिला जाईल.