प्रवीण देसाई / कोल्हापूर
जिह्यातील 4 लाख 17 हजार 377 रेशनग्राहकांचे पुढील महिन्यापासून रेशनवरील धान्य बंद होणार आहे. मोबाईल आधार क्रमांक सिडींग (ई-केवायसी) केले नसल्याने शासनाकडून ही कारवाई होणार आहे. राज्य सरकारने 31 जानेवारीपर्यंत आधारसिंडींगसाठी मुदत दिली होती. त्यानंतर ती वाढवून 15फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली. तरीही अनेक जणांनी आधारसिडींग केले नसल्याचे चित्र आहे.
जिह्यात अन्नसुरक्षा योजनेतील एकूण 25 लाख 29 हजार 251 रेशनग्राहक आहेत. त्यापैकी 21 लाख 11 हजार 874 ग्राहकांचे (ई-केवायसी) मोबाईल आधार क्रमांक सिडींगचे काम 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण झाले आहे. हे प्रमाण 83.50 टक्के इतके आहे. अद्याप 4 लाख 17 हजार 377 रेशन ग्राहकांचे आधारसिडींग झालेले नाही. यापूर्वी आधारसिंडींगसाठी दोनवेळा सरकारने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाने रेशन ग्राहकांना आधारसिडींग करण्याबाबत वेळोवेळी आवाहनही केले आहे. 15 फेब्रुवारीनंतर पुन्हा मुदतवाढीबाबत कोणतेही निर्देश राज्य सरकारकडून जिल्हा पुरवठा विभागाला अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे आधारसिडींग न केलेल्या जिह्यातील 4 लाख 17 हजार 377 ग्राहकांचे धान्य बंद होण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यापासून ही तात्पुरते धान्य बंद करण्याची कारवाई होणार आहे. परंतु संबंधितांचे रेशन आधारसिंडींग झाल्यास व सरकारकडून धान्य पूर्ववत देण्याबाबत निर्देश आल्यास संबंधित रेशनग्राहकाला धान्य पुर्ववत मिळू शकते, असे सुत्राकडून सांगण्यात आले.
आधारसिडींगसाठी दोनवेळा मुदतवाढ
ज्या रेशनग्राहकाचे आधारसिडींग झालेले नाही त्यांना 31 जानेवारीपर्यंत ते करुन घेण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडून जिह्यातील रेशन ग्राहकांना आवाहन करण्यात आले होते. 31 जानेवारीपर्यंत आधारसिडींग न केलेल्यांना 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर पुन्हा पाच दिवस वाढवून 15 फ़ेब्रुवारीपर्यंत मुदत वाढविली. त्यानंतर मुदतवाढीबाबत कोणतेही निर्देश राज्य सरकारकडून जिल्हा पुरवठा विभागाला आलेले नाहीत.
सध्या आधारसिडींग नसलेल्यांना धान्य वाटप सुरु
ज्या व्यक्तीची नोंद रेशनकार्डवर व पॉस मशिनमध्ये आहे. परंतु त्याचे आधारसिडींग (ई-केवायसी) झालेले नाही, अशा व्यक्तींना सध्या रेशनवर धान्य दिले जात आहे. त्यांना पुढील महिन्यापासून धान्य मिळणार नाही.
ज्या व्यक्तीच्या नावाची नोंद रेशनकार्ड व पॉस मशिनमध्ये आहे, परंतु त्यांचे आधारसिडींग झालेले नाही, त्यांना ते करुन घेण्यासाठी 31 जानेवारी व त्यानंतर 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. यानंतर पुन्हा मुदतवाढीबाबत कोणतेही निर्देश राज्य सरकारकडून आलेले नाहीत. त्यामुळे आधारसिडींग झालेले नाही त्यांचे पुढील महिन्यापासून तात्पुरते धान्य बंद होण्याची शक्यता आहे.
दत्तात्रय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी
जिह्यातील रेशनकार्डधारक व रेशनग्राहकांची संख्या
तालुका रेशनकार्डधारक रेशनग्राहक रेशनग्राहक (आधारसिडींग नसलेले)
शिरोळ 60062 271871 52211
आजरा 20773 89114 6856
गगनबावडा 4774 22223 2588
करवीर 71964 329309 37506
भुदरगड 25218 110155 17422
चंदगड 28927 128300 20611
गडहिंग्लज 34321 143544 24132
हातकणंगले 66716 317878 46462
इचलकरंजी 34068 152170 29906
राधानगरी 34102 159360 36721
शाहुवाडी 27959 129514 28196
कागल 40614 183811 40674
कोल्हूपर शहर 72621 295281 39091
पन्हाळा 42883 196721 35001
—————–ö
एकूण 565203 2529251 417377