प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. शहरासहित गावांमध्येही कोरोनाचे रुग्ण सापडत असताना अनेक गावे मात्र कोरोनाला रोखण्यात यशस्वी ठरली आहेत. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिह्यात 1551 गावांपैकी 1219 गावांमध्ये अद्याप कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. ग्रामकृतीदल, ग्रामस्थ व प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नांचे हे यश आहे.
मंगळवारी सायंकाळपर्यंत जिह्यात 2,945 कोरोना रुग्ण सापडले असून ते 332 गावांमधील आहेत. यात शहरी भागातील रूग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. जिह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे आढळला होता. हा रुग्ण परदेशवारी करून आला होता. त्यावेळी महिनाभराच्या कालावधीत रुग्णांची संख्या 6 इतकी झाली. त्यानंतर सुमारे 14 दिवसांच्या कालावधीत एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला नव्हता.
मे महिन्यापासून मुंबई, ठाणे आणि पुणेकर चाकरमानी गावात येण्यास सुरूवात झाल्यावर संगमेश्वर तालुक्यात पहिला मुंबईकर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. चाकरमान्यांची संख्या वाढत असतानाच जुलै महिन्यापासून स्थानिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग होवू लागला. आता कोरोना रूग्णांच्या संख्येने तीन हजारांचा टप्पा गाठला आहे. हे सर्व रूग्ण जिह्यातील केवळ 342 गावांमध्ये सापडले आहेत. जिह्यातील ग्रामपंचातीनी शासनाच्या कोरोनाबाबतीतच्या आदर्श नियमावलीची तंतोतंत अंमलबजावणी केली. त्यासाठी ग्रामस्थांनीही चांगली साथ दिली. याचा चांगला परिणाम दिसून आला असून 1200 हून अधिक गावे आजही कोरोनामुक्त आहेत.
जिह्यात आरोग्य विभागात रिक्त पदे असली तरी जे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत ते दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. ग्रामकृतिदलाने परजिह्यातून येणाऱया लोकांसाठी केलेले नियोजन यशस्वी ठरत आहे; मात्र शहरी भागामध्ये परजिह्यातून येणार्यांची वाढती रेलचेल, कोविड योध्दे आणि त्यांचे कुटूंबिय कोरोना बाधित आढळून येत असल्याने चिंतेची गोष्ट बनली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडूनही पाठपुरावा सुरु आहे.